मुंबई - सगळीकडे जसा कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. तसाच, मुंबईमध्येही गेल्या वर्षाभराहून अधिक काळ कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे. यासाठी सगळीकडे लॉकडाउन लावण्यात आला. दरम्यानच्या काळात अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मऱ्यांना आपल्या कामाच्या ठिकाणी पोहचवण्याचे काम बेस्ट कर्मचारी करत आहेत. दरम्यान, बेस्टच्या १०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत करण्याचे महापालिकेने घोषीत केले होते. त्यानुसार मृत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली.
बेस्ट लाईफलाईन
मुंबईत गेल्यावर्षी मार्च महिन्यात लॉकडाउन लावण्यात आले. त्यानंतर लोकल ट्रेन बंद करण्यात आली. लोकल ट्रेन बंद झाल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आपल्या कामाच्या ठिकाणी पोहचवण्याचे काम बेस्टवर सोपवण्यात आले. बेस्टचे कर्मचारी मुंबईसह बाजूच्या जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी पोहचवचण्याचे आणि घरी पोहचवण्याचे काम करत होते. लॉकडाउनला शिथिलता दिल्यावर सामान्य नागरिकांना बेस्टमधून प्रवासाची मुभा देण्यात आली. यामुळे बेस्ट मुंबईकरांची पहिली लाईफलाईन बनली आहे. आजही बेस्टमधून सुमारे २० लाख मुंबईकर प्रवास करत आहेत.