मुंबई -मालाड, मालवणी येथे काल रात्री ११ च्या सुमारास एक दुमजली घर शेजारील घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत १८ जण जखमी झाले. या जखमींना रुग्णालयात दाखल केले असता, त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला. आज सायंकाळी शोध कार्य सुरु असताना ढिगाऱ्याखालून आणखी एका व्यक्तीला बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यामुळे मालाड दुर्घटनेत जखमींची आकडा १९ वर तर मृतांचा आकडा १२ वर पोहचला आहे. या दुर्घटनेत एकाच कुटूंबातील ९ जणांचा मृत्यू झाला आहे.
- ठेकेदाराला अटक -
मालवणी इमारत दुर्घटना प्रकरणातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ठेकेदार रमजान शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच इमारतीचा मालकदेखील या प्रकरणात आरोपी आहे.
- मृतांचा आकडा १२ वर -
मालाड मालवणी गेट क्रमांक ८ येथील एक दुमजली घर काल बुधवारी रात्री ११ च्या सुमारास बाजूच्या घरावर कोसळले यामुळे ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले. या दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ढिगाऱ्याखाली रहिवासी अडकले असल्याने शोधमोहीम सुरु केली. आज सकाळपर्यंत्त १८ जणांना बाहेर काढण्यात आले. त्यांना जवळच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले असताना त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आज शोध मोहीम सुरु असताना आणखी एका ६० वर्षीय पुरुषाला ढिगाऱ्याखालून बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यामुळे मृतांचा आकडा १२ वर पोहचला आहे. मृतांमध्ये ८ लहान मुलांचा समावेश आहे. ७ जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. तर उर्वरित सहा जणांची प्रकृती स्थिर आहे. कोसळलेल्या घराचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू असून त्याखाली कोणी अडकले आहे का त्याचाही शोध अग्निशमन दलाकडून घेतला जात आहे.
- मालक आणि ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करणार -
मालाड मालवणी येथील इमारत दुर्घटने प्रकरणी दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या मालकासह ठेकेदाराविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. नुकत्याच आलेल्या तौक्ते चक्रीवादळानंतर इमारतीच्या मालकाने इमारतीची किरकोळ डागडुजी केली होती. अशी माहिती मुंबईचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली
- मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये -
मालाड मालवणी येथे इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची तसेच जखमीच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या दुर्घटनेबद्धल मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.