औरंगाबाद - गंगापूर साखर कारखान्यावरून माझ्यावर करण्यात येणारे आरोप खोटे असल्याचा दावा भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केला. प्रशांत बंब यांनी सभासदांच्या 9 कोटी रुपयांचा पैशांचा अपहार केल्याचा आरोप शिवसेनेच्या कृष्णा पाटील डोनगावकर यांनी केला होता. याबाबत बंब यांच्यावर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हासुद्धा दाखल झाला आहे. मात्र, केलेले आरोप खोटे असल्याचा आरोप प्रशांत बंब यांनी पत्रकार परिषदेत केला.
कारखाना विकण्यासाठी केला जातोय डाव
मराठवाड्यातील प्रश्न सतत मांडत असल्याने काही नेत्यांचा राग आहे. त्यामुळे आमच्या भागातील काही लोक पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचे तळवे चाटतात. त्यातून मराठवाड्यातील हा सधन कारखाना पश्चिम महाराष्ट्राती नेत्यांना विकण्याचा यांचा डाव असल्याचा आरोपही बंब यांनी केलाय. मात्र त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याने आपण तस होऊ देणार नाही. असा इशारा प्रशांत बंब यांनी दिला.
हेही वाचा -नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश
जयंत पाटील यांचा हात?
साखर कारखान्याच्या मुद्द्यावरून मात्र राजकीय दबावातून हा गुन्हा दाखल झाला असल्याचा आरोप प्रशांत बंब यांनी केलाय. कोर्टात प्रकरण सुरु आहे. त्यातून सत्य बाहेर येईल, डोनगावकर यांनीच कारखान्याची फसवणूक केली आहे. याबाबत त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. राज्याचे मंत्री जयंत पाटील यांच्या मार्फत राजाराम फड यांनी हा कारखाना खरेदी केला होता. मात्र त्यानंतर कारखान्याचे सात कोटी रुपये जप्त करण्याऐवजी फड यांना पंधरा कोटी रुपये देण्यात आले. कारखाना वाचावा, तो चालू राहावा, यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना अनेक अडचणी त्यामधून आणल्या जात आहेत. यातून शेतकऱ्यांचा मोठे नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचे 15 कोटी 75 लाख रुपये अडचणीत सापडले आहेत. आम्हाला या पैशातून कारखान्याची मशनरी दुरुस्ती करायची होती. पश्चिम महाराष्ट्रातील कारखाने शेतकऱ्यांचे उसाचे पैसे चोरण्याचा प्रयत्न करतात, 2 वर्ष त्यांना पैसे देत नाही. त्यामुळे हा कारखाना चालू करने आमच्या साठी महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांना आज ना उद्या पैसे आम्ही मिळवूनच देऊ, मात्र शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्यांची गय आम्ही करणार नाही. असा इशारा प्रशांत बंब यांनी पत्रकार परिषदेत दिला.
हेही वाचा -पालघर : जव्हारमधील आश्रमशाळेतील 38 मुलांना कोरोना संसर्ग; 3 तीन शिक्षकांचाही समावेश