मुंबई- कोरोना महामारीचा केंद्र सरकारच्या तिजोरीला मोठा फटका बसला आहे. चालू वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत केंद्र सरकारच्या एकूण कर संकलनात तसेच आगाऊ (अॅडव्हान्स) कराच्या संकलानात २२.५ टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. यामध्ये १५ सप्टेंबरपर्यंत २ लाख ५३ हजार ५३२ कोटी रुपयांचे एकूण करसंकलन झाले आहे.
केंद्र सरकारच्या तिजोरीला फटका; दुसऱ्या तिमाहीतील कर संकलनात २२.५ टक्क्यांची घट
केंद्र सरकारला दुसऱ्या तिमाहीत मिळणाऱ्या महसुलात मोठी घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. टाळेबंदी काढूनही देशाची अर्थव्यवस्था सावरली नसल्याचे हे चित्र आहे.
प्राप्तिकर विभागाने करसंकलनाची तात्पुरती आकडेवारी जाहीर केली आहे. गतवर्षी दुसऱ्या तिमाहीत १५ सप्टेंबरपर्यंत एकूण ३ लाख २७ हजार ३२० कोटी रुपयांचे कर संकलन झाले होते. चालू आर्थिक वर्षातील आगाऊ कराची माहिती देण्यास सूत्राने नकार दिला आहे. बँकांनी माहिती अपडेट केल्यानंतर अंतिम आकडेवारी मिळू शकणार असल्याचे प्राप्तिकर विभागातील सूत्राने सांगितले. जूनअखेर पहिल्या तिमाहीत एकूण कराच्या संकलनात ३१ टक्क्यांनी घटले होते. तर, आगाऊ कराच्या संकलनात ७६ टक्क्यांनी घट झाली होती.
कोरोना महामारी आणि टाळेबंदीने देशातील उद्योग व व्यवसायांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारला मिळणाऱ्या करसंकलनात मोठी घसरण झाली आहे.