नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला असून रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढताना दिसत आहे. महाराष्ट्र, उत्तराखंडपाठोपाठ आता मध्य प्रदेशमध्येही कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांमध्ये मध्य प्रदेशमध्ये 51 जणांचा मृत्यू झाला आहे. यातच भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री प्रेम सिंह पटेल यांनी धक्कादायक विधान केले आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यू कोणीच रोखू शकत नाही. मरणाऱ्यांना कोणी वाचवू शकणार नाही, वय झालं की मृत्यू होणारच, असे विधान त्यांनी केले आहे. या वादग्रस्त विधानामुळे ते टिकेचे धनी बनले आहेत.
कोरोना टाळण्यासाठी मास्क घालावा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळावे. कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन आम्ही सर्व विधानसभा मतदार संघात जाऊन करीत आहोत. सोशल डिस्टन्सिंग पाळणे आता लोकांवर अवलंबून आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यू कोणीच रोखू शकत नाही. मरणाऱ्यांना कोणी वाचवू शकणार नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणाला शंका असेल तर डॉक्टरांना भेटा आणि कोरोनाबद्दल माहिती जाणून घ्या, असे ते म्हणाले. त्यांचे हे विधान सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत आहे.