रामगंजमंडी/कोटा -उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह गावात घेऊन जाण्यासाठी ग्रामस्थांनी चक्क पूर आलेली ताकली नदी पार केल्याची घटना समोर आली आहे. राजस्थानातील सारनखेडी गावातील ग्रामस्थांनी जीवाची बाजी लावत मृतदेह खाटेला बांधून ट्यबच्या सहाय्याने नदी पार केली.
मृतदेह खाटेला बांधून ट्यूबच्या सहाय्याने ग्रामस्थांनी केली नदी पार
ही घटना राजस्थानाच्या रामगंजमंडी शहराजवळीत सारनखेडी गावात घडली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. देशातील अनेक भागात ग्रामस्थांना अशा नरकयातना सहन कराव्या लागत आहेत.
सारनखेडी गावातील ग्रामस्थ सोनू कुमारने सांगितले की, गावातील मांगीलाल गुर्जर यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचा मृतदेह गावात आणायचा होता. मात्र, वाटेत असणाऱ्या ताकली नदीला पूर आलेला होता. त्यामुळे ग्रामस्थांनी मृतदेह खाटेला बांधून ट्यूबच्या सहाय्याने नदी पार केली. त्यानंतर त्यांचा अंत्यविधी करण्यात आला.
ग्रामस्थांनी सांगितले की, ताकली बांध योजनेच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या गांवातील ग्रामस्थांना अनेक समस्यांचा समना करावा लागत आहे. त्यांना योग्य मोबदला देखील मिळालेला नाही. प्रशासनाकडून गावात सरकारी सेवा देखील देण्यात येत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून नदी पार करावी लागते. तसेच अनेकदा या गावांचा संपर्क तुटतो.