महाराष्ट्र

maharashtra

Top 10 @ 9 PM : रात्री नऊ वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या...

By

Published : Dec 5, 2020, 7:01 AM IST

Updated : Dec 5, 2020, 9:05 PM IST

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Top 10 @ 9 PM : रात्री नऊ वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या...
Top 10 @ 9 PM : रात्री नऊ वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या...

  • मुंबई -राज्यात आज (शनिवारी) ४,९२२ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १८,४७,५०९ वर पोहचला आहे. तसेच राज्यात आज ९५ कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंत एकूण ४७,६९४ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५८ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ८२,८४९ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सविस्तर वाचा-महाराष्ट्र कोरोना अपडेट : राज्यात ४,९२२ नवीन रुग्णांचे निदान, ९५ रुग्णांचा मृत्यू

  • दिल्ली मार्च :केंद्र सरकारबरोबरची शेतकऱ्यांची पाचवी बैठकही निष्फळ ठरली आहे. त्यामुळे आता पुन्हा ९ डिसेंबरला केंद्रासोबत शेतकरी नेत्यांची बैठक होणार आहे. दरम्यान, उद्या शेतकरी नेत्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. आजची बैठक संपल्यानंतर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पत्रकार परिषद घेतली. किमान आधारभूत किंमतीला सरकार हात लावणार नसून शेतकऱ्यांच्या सर्व शंका सरकार दूर करेल, असे आश्वासन त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांना दिले.

सविस्तर वाचा-'किमान आधारभूत किमतीला हात लावणार नाही, शेतकऱ्यांच्या सर्व शंका दुर करू'

  • जयपूर -भाजपा महाराष्ट्र आणि राजस्थानातील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. देशातील लोकशाही धोक्यात असल्याचे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. सिरोही जिल्ह्यातील शिवगंज येथे नूतन काँग्रेस कार्यालयाच्या उद्धाटनासाठी आयोजित केलेल्या व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सविस्तर वाचा-'महाराष्ट्र आणि राजस्थानातील सरकार पाडण्यासाठी भाजपा प्रयत्नशील'

  • रायगड - रायगड पोलिसांच्या पुनर्विचार याचिकेबाबत असलेली आजची सुनावणी ही पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी आता 17 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे रायगड पोलिसांच्या या याचिकेवर जिल्हा सत्र न्यायालय काय निर्णय देणार हे 17 डिसेंबरला कळणार आहे.

सविस्तर वाचा-अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण; रायगड पोलिसांच्या पुनर्विचार याचिकेवर 17 डिसेंबरला सुनावणी

  • अमरावती - बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या महामार्गाचे काम चांगल्या पद्धतीने सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. चांगल्या दर्जाचं काम होत आहे. कोरोना काळातही समृद्धी महारार्गाचं काम सुरु होतं. येत्या 1 मे 2021 पर्यंत नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावरील प्रवास सुरु होईल असे त्यांनी जाहीर केले तर मे 2022 पर्यंत मुंबईपर्यंत महामार्ग सुरु होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सविस्तर वाचा-बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग 1 मे 2021 मध्ये वाहतूकीसाठी खुला होणार, मुख्यमंत्री ठाकरेंची माहिती

  • कोल्हापूर- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना वाटते, सगळे जग आपल्या ताब्यात असले पाहिजे. मात्र, विधान परिषदेच्या या निकालातून त्यांना चांगलीच चपराक बसली असल्याचे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हंटले आहे. शिवाय या निकालातून सुशिक्षित पदवीधर मतदारांनी भाजपला नाकारल्याचे स्पष्ट झाले असल्याचेही ते म्हणाले. निवडणुकीपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी भाजप एकटा पक्ष सर्वांना पुरून उरेल, असे म्हटले होते. त्यानंतर सतेज पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सविस्तर वाचा-दादांना वाटतंय सगळं जग ताब्यात असले पाहिजे; मात्र निकालातून चपराक - सतेज पाटील

  • बीड -मातीच्या अस्तित्वावरच मानवाचे अस्तित्व अवलंबून आहे. माती जिवंत राहिली तरच माणसे जिवंत राहू शकतील. हा विचार घेऊन बीडच्या एका तरुणाने वयाच्या 21 व्या वर्षी सेंद्रिय शेतीमध्ये काम सुरू केले. शेतकऱ्यांच्या शेतातील शेणाच्या उकिरड्यावरून सुरू झालेल्या बीडच्या या तरुणाचा प्रवास आजही सुरू आहे.

सविस्तर वाचा-ईटीव्ही भारत विशेष: मातीच्या आरोग्यासाठी सरसावला बीडचा अवलिया; पाच लाख शेतकऱ्यांना दिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण

  • मुंबई - राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर राहावे असे वाटत असेल तर काँग्रेसच्या नेत्यांवर टीका टिप्पणी करणे टाळा, असा सल्ला महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिला आहे. त्यांचा रोख हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सातत्य नाही, असे वक्तव्य पवार यांनी एका मुलाखतीत नुकतेच केले होते. त्या पार्श्वभूमीवर ठाकूर यांनी ट्वीट करत पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

सविस्तर वाचा-पवारांवर भडकल्या यशोमती ठाकूर, 'सरकार स्थिर राहावं वाटत असेल तर..'

  • (बंगळुरू) कर्नाटक: मराठा विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी कर्नाटक सरकारने घेतला होता. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात कन्नड समर्थक संघटनांनी आज बंदची हाक दिली आहे. आज राजधानी बंगळुरूसह राज्यभरात बंद पाळण्यात येत आहे.

सविस्तर वाचा-मराठा विकास प्राधिकरण स्थापनेच्या विरोधात कर्नाटक बंद; कन्नड संघटनांचा मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा

  • नवी दिल्ली -ऑस्ट्रेलियासह सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतून अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा बाहेर पडला आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरचा संघात समावेश करण्यात आला आहे. शुक्रवारी कॅनबेरा येथे झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यादरम्यान जडेजाच्या डोक्याला दुखापत झाली. त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून युझवेंद्र चहलला संघात घेण्यात आले. चहलने या संधीचे सोने करत तीन गडी बाद केले.

सविस्तर वाचा-रवींद्र जडेजा संघातून 'आऊट', 'या' खेळाडूला संघात स्थान

Last Updated : Dec 5, 2020, 9:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details