नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान दरम्यान असलेला कर्तारपूर कॉरिडॉर ९ ऑक्टोबर रोजी सुरू झाला. मात्र, कर्तारपूर कॉरिडॉर ही योजना पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची होती. या कॉरिडॉरमुळे भारताचे कधीही भरून न निघणारे नुकसान होणार असल्याचे पाकिस्तानी रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी म्हटले आहे. या वक्तव्यामुळे पाकिस्ताचा कुटील डाव उघड झाल्याचे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - करतारपूर : सुरक्षेसंबंधी पाकिस्तान अजूनही गंभीर नाहीच!
कर्तारपूर कॉरिडॉरमुळे भारताला मोठी हानी पोहचणार आहे, ती भारताच्या कायम लक्षात राहील. जनरल बाजवा यांनी या योजनेद्वारे भारताला मोठा धक्का दिल्याचे रशीद म्हणाले. कर्तारपूर कॉरिडॉर ही योजना इम्रान खान यांनी पूर्णत्त्वास नेल्याचे वातावरण पाकिस्तानने निर्माण केले आहे. मात्र, रेल्वे मंत्र्यांनी केलेले वक्तव्य या योजनेमागे लष्कर असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पाकिस्तान शांततेचा दूत आहे, असे जगाला दाखवण्याचा प्रयत्नही पाकिस्तानकडून करण्यात आला.
शिख धर्मियांचे पवित्र स्थळ गुरुनानक देव हे पाकिस्तानमध्ये आहे. हे पवित्र स्थळ भारतातील गुरुदासपूर येथील डेरा बाबा नानाक या पवित्र स्थळाला एका कॉरिडॉरद्वारे जोडण्यात आले आहे. त्यामुळे भारतातील शीख बांधवांना विना व्हीजा गुरुनानाक देव यांचे दर्शन घेण्याकरीता पाकिस्तानात जाता येणार आहे. त्यासाठी साडेचार किलोमिटरचा कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. यातून पाकिस्ताने जगभरातील शीख धर्मीयांचे मने जिंकली आहेत. मात्र, पाकिस्तान रेल्वे मंत्र्याच्या वक्तव्यामुळे यामागे भारताला धोका पोहचवण्याचा कुटील डाव उघड झाला आहे.
हेही वाचा - कर्तारपूर कॉरिडॉर उद्घाटन समारंभ : इमरान खान यांनी विचारलं,आमचा सिद्धू कुठाय?
पाकिस्तानी रेल्वेमंत्री शेख रशीद हे कायमच भारतविरोधी गरळ ओकत असतात. त्यांच्या बेजबाबदार वक्तव्यामुळे ते सोशल मिडियावरही कायम ट्रोल होत असतात. पाकिस्तानकडे १२५ ते २५० ग्रॅमचे अणुबॉम्ब असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. तसेच काश्मीरची स्वायत्ता काढल्यानंतर दोन्ही देशात मोठे युद्ध होणार असल्याचे भाकित त्यांनी केले होते. त्यावरून भारतातील नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच झोडपून काढले होते.