महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 29, 2019, 12:24 PM IST

ETV Bharat / bharat

फिट इंडिया मूव्हमेंट:  तुम्ही निरोगी रहाल तर देश सुदृढ बनेल - मोदी

धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक लोक आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे फिट इंडिया अभियान एक जनआंदोलन बनण्याची गरज आहे, असे  मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली - पंतप्रधान मोदींनी गुरुवारी सकाळी दिल्लीमध्ये फिट इंडिया मूव्हमेंट या अभियानाचा प्रारंभ केला. यावेळी बोलताना त्यांनी निरोगी जीवनाचे महत्त्व पटवून दिले. धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक लोक आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे फिट इंडिया अभियान एक जनआंदोलन बनण्याची गरज आहे, असे मोदी म्हणाले.

आपल्या देशाला मेजर ध्यानचंद सारखे खेळाडू मिळाले. आज जग त्यांना नावाजत आहे. या अभियानाद्वारे देशामध्ये फिट होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यात येत आहे. सर्वच क्षेत्रांमध्ये पुढे जाणयासाठी निरोगी असणे गरजेचे आहे. देशाची जनता या अभियानाला पुढे घेऊन जाईल. यामध्ये 'झिरो इनव्हेस्टमेंट' आहे, हे अभियान फक्त सरकारचे नसून देशातील सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

आपले युवा खेळाडू जगामध्ये भारताचे नाव उंचावत आहेत. त्यांच्यापासूनही लोकांना प्रेरणा मिळेल. फिटनेस अभियान यशस्वी राबवण्यासाठी सर्व राज्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. तुम्ही स्वत: फिट असाल तर देश तंदुरुस्त असेल. देशातील नागरिक आरोग्यवान असतील तर देश पुढे जाईल असे मोदी म्हणाले. राज्य, शाळा विद्यालये, स्थानिक प्रशासन, खासगी आस्थापने, कुटुंब सगळीकडे आरोग्याबाबत जनजागृती होण्याची गरज मोदींनी व्यक्त केली.

खेळ, व्यायाम तुमच्या जीवनाचा एक अभिन्न भाग बनला पाहिजे, असे मोदी म्हणाले. आपल्या पूर्वजांना निरोगी कसे राहायचे माहीत होते. त्यावेळी रोजच्या कामातूनच लोकांचा व्यायाम व्हायचा. मात्र, आता लोकांनी व्यायामाकडे पाठ फिरवली आहे. आपल्या समाजामध्ये आरोग्याची काळजी घेण्याबाबत उदासीनता दिसून येते, असे मोदी म्हणाले.

फिटनेस हा फक्त शब्द नसून निरोगी जीवन जगण्यासाठी अपरिहार्य आहे, असे मोदी म्हणाले. आज देशामध्ये विविध आजार वाढत आहेत. ३० वर्षाच्या युवकालाही हृदयविकराचा झटका आल्याचे ऐकायला मिळत आहे. सरकार लोकांना स्वस्थ ठेवण्यासाठी काम करतच राहील, मात्र प्रत्येक कुटुंबाने निरोगी राहण्यासाठी विचार करायला पाहिजे, असे मोदी म्हणाले.

देशातील प्रत्येक शाळा आणि महाविद्यालायाला फिटनेसबाबत १५ दिवसांचे नियोजन बनवण्यास सांगण्यात आले आहे. तसेच विद्यालयाच्या संकेतस्थळावर ते टाकण्यास सांगितले आहे. फिट इंडिया मूव्हमेंट सुरू करण्यासाठी सरकारने नुकतेच एका समिती स्थापनी केली होती. त्यामध्ये भारतीय ऑलिंपिक संघ, राष्ट्रीय क्रीडा संघ, सरकारी अधिकारी आणि देशातील फिटनेस आयकॉनचा समावेश होता. संपूर्ण भारतामध्ये आरोग्याबाबत चळवळ निर्माण झाली पाहिजे, असे आवाहन मोदींनी सर्वांना केले.

ABOUT THE AUTHOR

...view details