नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले तीन नवे रुग्ण आढळले आहेत. नवी दिल्ली, राजस्थान आणि तेलंगाणामध्ये हे रुग्ण आढळले आहेत. या तिघांनाही सध्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजत आहे.
यांपैकी दिल्लीतील रूग्ण हा इटलीहून भारतात परतला होता, तर तेलंगाणामधील रूग्ण दुबईहून भारतात परतला होता, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली. ते पुढे म्हणाले, की सध्याची परिस्थिती पाहता, चीन आणि इराकमधील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा भारतीय व्हिसा देण्यात येणार नाही. परिस्थिती आणखी बिघडल्यास हीच बंदी इतर देशांनाही लागू करण्यात येऊ शकते, असेही ते म्हणाले. तसेच त्यांनी अगदीच आवश्यक असल्याशिवाय चीन, इराण, कोरिया, इटली आणि सिंगापूर या देशांमध्ये जाऊ नये, असे आवाहनही लोकांना केले आहे.