भोपाळ : काँग्रेसने ज्योतिरादित्य सिंधियांना विश्वासघातकी म्हटले होते. यावर काँग्रेसने तर, मध्य प्रदेशचे शेतकरी, महिला आणि तरुणांचा विश्वासघात केला आहे, अशा शब्दांत सिंधियांनी काँग्रेसवर पलटवार केला आहे. ते शनिवारी इंदूरमधील एका सभेत बोलत होते.
"आज ते (काँग्रेस) म्हणत आहेत की, ज्योतिरादित्य सिंधिया हा एक विश्वासघातकी आहे. मी त्यांना एवढेच विचारेन की, दहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची त्यांनी जी घोषणा केली होती त्याचे काय झाले? काँग्रेस हा असा पक्ष आहे ज्याने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. ते केवळ विश्वासघातकी नाही, तर देशद्रोही सुद्धा आहेत" असेही सिंधिया यावेळी म्हणाले.
यावेळी त्यांनी शिवराज सिंह चौहान सरकारच्या कामाचे कौतुकही केले. कन्यादान योजनेंतर्गत राज्य सरकार लोकांना २५ हजार रुपये देत आहे. काँग्रेसने ५१ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिल्यामुळे अनेक लोकांनी लग्ने केली. मात्र, घोषणेच्या वर्षभरानंतरही लाभार्थींना त्यांचे पैसे मिळाले नाहीत. अशा प्रकारे काँग्रेसने राज्यातील माय-लेकींचाही विश्वासघात केला, असे सिंधिया म्हणाले.