शिमला -पूर्व लडाखमध्ये सीमावाद सुरु असतानाच चीनने आता हिमालच प्रदेशातही आक्रमक धोरण स्वीकारल्याचे पाहायला मिळत आहे. हिमालच प्रदेशतील किन्नूर जिल्ह्यात भारत-चीन सीमेवरील ‘नो मेन्स लँड’(बफर झोन) म्हणजेच नागरिकांस प्रवेश नसलेल्या भागात चीनकडून रस्त्याचे बांधकाम सुरु असल्याचे समोर आले आहे. सीमेवरील स्थानिक गावकऱ्यांनी या भागाची पाहणी केली असून रस्ता बांधण्यात येत असल्याचा दावा केला आहे.
गावकऱ्यांसोबत निमलष्करी दलाच्या जवानांनीही या भागाची पाहणी केली आहे. सुमारे 20 कि.मी लांबीचा रोड चीनने बफर झोनमध्ये बांधल्याचे गावकऱ्यांनी म्हटले आहे. हा भाग भारत चीन सीमेच्या अगदी जवळ असून आणखी पुढे रस्ता वाढण्याचे चीनचे नियोजन दिसत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. भारताची सीमा येथून फक्त 2 किमी असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
मागील वर्षी तीबेटमधील सीमेवरील शेवटचे गाव टांगोपर्यंतच चीनचा रस्ता होता. मात्र, आता यापुढे 20 किमीचा रस्ता बांधण्यात आला आहे. याशिवाय हिमालच प्रदेशातील किन्नूर जिल्ह्यातील सांगला खोऱ्यात यामरांग लापर्यंत चीन रस्ता बांधत असल्याची माहिती पुढे आली आहे. या भागात रात्रीच्या वेळी अनेक ड्रोन पहायला मिळतात, असे स्थानिक गावकऱ्यांनी सांगितले.
8 जूनला रांगग्रीक तुम्मा या सीमेवरील भागात 20 ड्रोन घिरट्य़ा घालत असल्याचे एका बुद्ध पुजाऱ्याने पाहिले होते. या भागात कायम ड्रोन दिसतात, असे गावकऱ्यांनी सांगितले. सीमेपासून फक्त 2 किलोेमीटर लांब अंतरापर्यंत चीनने रस्ते बांधले असल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे. 5 खोदकाम करण्यासाठी यंत्रे आणि अनेक ट्रकद्वारे रस्ते बांधण्याचे काम सुरु असून रात्रीच्या वेळी काम वेगाने करण्यात येत असल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे. सीेमेवरील या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.