मुंबई Nawab Malik : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावर तत्कालीन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भर पत्रकार परिषदेतून गंभीर आरोप केल्यानंतर ईडीच्या माध्यमातून नवाब मलिक यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. मात्र महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर महायुतीसरकारमध्ये अजित पवार सहभागी झाले. आता अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवाब मलिक यांची आठवण झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामुळं नवाब मलिक आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर दिसायचं. मात्र, मंगळवारी रात्री नवाब मलिक यांनी अजित पवार यांच्या देवगिरी निवास्थानी पक्षाच्या बैठकीला हजेरी लावल्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या असून त्यावर आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक नेमके आहेत कुठं यावर राजकीय विश्लेषकांची प्रतिक्रिया काय ते बघूया.
नवाब मलिक नेमके कुठं, कोणी सांगायला तयार नाही : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवारांचा गट सत्तेत सहभागी झाला. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक ईडी कोठडीत होते. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या काळात नेमके ते कोठडीतून बाहेर आले. त्यानंतर मलिक यांनी नागपूर येथील अधिवेशनाला हजेरी लावत सत्ताधारी बाकावर बसले आणि आपण अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असल्याचा संदेश दिला होता. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्राच्या माध्यमातून मलिक यांचा सत्ताधारी गटात समावेशावर नाराजी व्यक्त करत गंभीर आरोप असलेल्या नवाब मलिकांना महायुतीचा भाग करणं योग्य नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर अधिवेशनात नवाब मालिक दिसले नाहीत. नवाब मालिक कोणत्या गटाकडे आहेत, यावर आपल्याला माहिती नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं. तर नवाब मालिक नेमकं कोणत्या गटाकडे या प्रश्नाचं उत्तर त्यावेळी देखील आणि त्यानंतर देखील राष्ट्रवादीचे नेते नवाब मालिक यांनी दिलं नव्हतं. सत्ताधारी भाजपाच्या दबावामुळंच आपल्या ज्येष्ठ नेत्याला दूर ठेवावं लागल्याच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या.
नवाब मलिक कोणासोबत स्पष्ट झालं - जितेंद्र आव्हाड : याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले, नवाब मलिक यांचा पाठिंबा कोणाला आहे, हे कुणालाच कळलं नाही. मात्र नवाब मलिक कुणासोबत आहेत ते कालच्या बैठकीत स्पष्ट झालं. त्यामुळं ते युतीसोबत आहेत हे स्पष्ट झालं आहे." तसंच त्यांचा फायदा घेतला जातोय का, हे त्यांनी ओळखायला हवं असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे. मात्र महायुती कोणाची हाकालपट्टी करतात ते पाहावे लागेल, असंही आव्हाड म्हणाले.