वर्धा - वर्षातील सर्वात मोठा समजला जाणारा दिवाळी हा सण, अवघ्या काही दिवसांवर येऊन ठपला आहे. यावेळी खरेतर, सर्व घरांमध्ये खरेदीची लगबग सुरु असते. मात्र, महाराष्ट्र राज्य परिवाहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या घरी मात्र वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. ऐन दिवाळीतही या कर्मचाऱ्यांना बोनस तर मिळाला नाहीच, मात्र त्यांचे वेतनदेखील अजून मिळाले नाहीये.
शुक्रवारपासून दीपावली हा सण सुरु होतोय. मागील वर्षापासून दिवाळीपूर्वी मिळणारे वेतन आणि बोनस, हे यंदा दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठपली तरी मिळाले नाहीये. वेतन न मिळण्यामागे, परिवाहन मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा हे कारण असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमधून ऐकायला मिळते आहे.
राज्य परिवाहन मंडळाचे वरिष्ठ अधिकारी हे अभ्यास दौऱ्यासाठी बेल्जिअमला गेले आहेत. दिवाळीपूर्वी हा दौरा संपून अधिकारी मायदेशी परतणार होते. मात्र, आता दिवाळीला अवघे दोन दिवस राहिले आहेत. त्यामुळे अभ्यासदौऱ्यावरून आल्यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने यासंदर्भात निर्णय न घेतल्यास, कर्मचाऱ्यांच्या दिवाळीवर नक्कीच संक्रांत येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : वाघाच्या भीतीमुळे 'या' गावात झाले नाही मतदान...