सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील चौकुळ, गेळे व आंबोली येथील गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला कबूलायतदार यांचे जमिनी हक्काबाबतचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावू त्यासाठी शासन स्तरावर उच्च स्तरीय बैठकीचे आयोजन करू, असे आश्वासन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे दिले.
आंबोली येथे कबुलायतदार गावकर जमीन वाटप समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, सावंतवाडी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, सावंतवाडी सहायक वन संवरक्षक आय. डी. जळगांवकर, सावंतवाडी आर. एफ. ओ. दिगंबर जाधव, गट विकास अधिकारी वासुदेव नाईक व विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
कबुलायतदारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात बोलावणार तातडीच बैठक
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, की जिल्ह्यातील कबुलायतदार गेले अनेक वर्ष जमीन हक्कासाठी शासनस्तरावर प्रयत्न करीत आहेत. त्यांचा हा अविरत लढा सुरूच असून या लढ्याला आता सत्यात उतरणार आहे. कबुलायतदारांचा हा प्रश्न निकाली निघाल्यानंतर त्यांच्या येणाऱ्या पिढीला ही बाब सुखकारक असणार आहे. कबुलायतदार यांना जमिनीचे वाटप करताना कोणावरही अन्याय न होता समान पद्धतीने त्यांना न्याय दिला जाईल. शासन आपल्या दरबारी येऊन आपल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कटिबद्ध असून या पुढे ही कबुलायतदारांचे निर्माण होणारे प्रश्न सोडवण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली. कबुलायतदार यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री, महसूलमंत्री व उच्चस्तरीय अधिकारी यांची मंत्रालयात तातडीने बैठक आयोजित करण्यात येईल, असेही राज्यमंत्री सत्तार म्हणाले.
कबुलायतदार हे जमिनीचे हकदार होणार - आमदार केसरकर
आमदार दीपक केसरकर यावेळी म्हणाले, की गेली कित्येक वर्षे चौकुळ, गेळे, आंबोली या कबुलायतदारांचे प्रश्न प्रलंबित होता. आम्ही सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केले.आता हा प्रश्न अंतिम टप्यात आला आहे. कबुलायतदारांचे प्रश्न सोडण्यासाठी उच्च स्तरावर सर्व प्रकारची कारवाई पूर्ण होत आली आहे. यासाठी गेली अनेक वर्षे जो संघर्ष सुरू होता. तो आता सत्यात उतरणार आहे. त्यामुळे कबुलायतदार हे जमिनीचे हकदार होणार आहेत. कबुलायतदारांचा जमीन हक्काचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर शासनाच्या विविध योजनांचा, आपत्तीमुळे नुकसान झाले तर त्यांच्या भरपाई बाबतचे लाभ त्यांना मिळण्यास ते पात्र होतील. तसेच इतर अनेक शासकीय योजनेचे लाभ संबंधिताना घेता येतील.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी यावेळी कबुलायतदार आणि शासन यांच्यात जी शासन स्तरावर कार्यवाही झाली त्याबाबतची सविस्तर माहिती या बैठकीत सादर केली. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सतार यांनी कबुलायदारांच्या गावातील समस्या जाणून घेतल्या.
हेही वाचा - 'शिपाई होण्याची लायकी नसलेल्या माणसाला बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केले'