पुणे - बिहार निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. या निकालात बिहारमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाले आहे. त्यामुळे या निकालाचे पडसाद पुढील सर्व निवडणुकांवर दिसून येतील, असा विश्वास भाजपाचे प्रेदशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपच्या संग्राम देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. अर्ज भरल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मी या मतदारसंघासाठी अनेक गोष्टी केल्या-
पुणे पदवीधर मतदारसंघ हा भाजपची परंपरागत सीट आहे. याठिकाणी भाजपचे संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे, युवका संबंधीच्या अनेक संस्था ट्रस्टचे ते अध्यक्ष आहेत. त्यांना युवकांच्या प्रश्नांची जाणीव आहे. पदवीधर आमदार असताना मी अनेक गोष्टी या मतदारसंघासाठी केले आहेत. त्यामुळे संग्राम देशमुख यांच्यासह आमचे तीन पदवीधरचे उमेदवार असे सगळे उमेदवार शिक्षक आणि पदवीधर यांच्या प्रश्नावर भांडतील, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.
मनाचीही भूक भागली पाहिजे-
बिहार निवडणुकीसंदर्भात बोलताना या निवडणुकीचा सकारात्मक परिणाम पुढील सर्वच निवडणुकांवर होईल, असा दावा त्यांनी व्यक्त केला. राज्यांमध्ये प्रार्थनास्थळे सुरू करण्याबाबत बोलताना लोकांची मनाची भूक भागली पाहिजे, मंदिर, मशीद, चर्च अशी सर्वच प्रार्थनास्थळे उघडली पाहिजेत. पोटाची भूक असते, तशी मनाची भूक भागविली पाहिजे. त्यामुळे सरकारने मंदिर प्रार्थनास्थळे सुरू केली पाहिजे, असेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.