पालघर - विविध मागण्यांसाठी आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मात्र, हे आंदोलन दडपण्याचा प्रकार महाविकास आघाडीकडून केला जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. जिल्ह्यातील नगरपंचायतीमधील भ्रष्ट्राचार, भूकंप बाधितांना नुकसान भरपाई द्यावी, कुपोषण, शेतीविषयक मागण्या आदींवर हे आंदोलन होत आहे.
हेही वाचा - अहमदनगर तहसील कार्यालयात बेकायदेशीर वृक्षतोड; महानगरपालिकेने केला पंचनामा
माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. याआधी भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मनाई आदेश नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तरी हे आंदोलन होणारच, असा ठाम निर्धार भाजपचे जिल्हा सरचिटणीस संतोष जणाठे यांनी करून कार्यकर्त्यांनी जसे जमेल तसे आंदोलनास पोहचावे, असे आवाहन केले आहे. 20 नोव्हेंबरला सकाळी 11 च्या सुमारास हे आंदोलन पालघरच्या हुतात्मा चौकातून पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे धडकले. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयावर काढल्या जाणाऱ्या या मोर्चाआधीच पोलिसांकडून ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांची धरपकड झाली.
जिल्ह्यात जमावबंदी लागू असल्याने खबरदारी म्हणून ही कारवाई केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
हेही वाचा - मृत कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 50 लाखांची मदत; सरकारला आली जाग