नाशिक - एका टीव्ही चॅनलवरील कॉमेडी शोमध्ये सिने अभिनेत्री रविना टंडन, फराह खान, भारती सिंग यांनी केलेल्या वक्तव्याचे विविध ठिकाणी पडसाद उमटत आहेत. मनमाडमध्येही ख्रिश्चन बांधवांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून तिघींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. वरिष्ठांशी चर्चा करून त्यांचा निर्णय आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी मोर्चेकऱ्यांना दिले.
एका टीव्ही चॅनलच्या कॉमेडी शोमध्ये सिने अभिनेत्री रविना टंडन, फराह खान, भारती सिंग यांनी बायबलमधील 'हालेलुया' या पवित्र शब्दाचा गैर अर्थ लावल्याची तक्रार ख्रिश्चन बांधवांची आहे. या विरोधात रविवारी कॅम्प भागातून धर्मगुरू संदीप वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांना निवेदन देण्यात आले. 'हालेलुया' हा शब्द बायबलमध्ये असून तो आमच्यासाठी अत्यंत पवित्र आहे. मात्र, या तिघींनी या शब्दाचा अवमान केल्यामुळे समस्त ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. या मोर्चात ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.