नागपूर - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे नवे विधानसभा अध्यक्ष कोण, यासंदर्भात संपूर्ण राज्यभरात चर्चा रंगली आहे. केवळ या विषयावर चर्चाच चांगली नाही, तर महाविकासआघाडीतील तीनही पक्ष दबक्या आवाजात या पदावर आपला दावा सांगत आहेत. त्यामुळे कुठेतरी आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात काँग्रेसचे नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे त्यांनी म्हटले आहे.
प्रदेशाध्यक्षपदाबाबत माहिती नाही -
काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद देण्याऐवजी उपमुख्यमंत्री पद देण्यात यावे, अशा चर्चादेखील दबक्या आवाजात सुरू झाली आहे. एवढेच नाही, तर उपमुख्यमंत्रीपदी विजय वडेट्टीवार यांची नेमणूक करण्यात यावी, अशीदेखील चर्चा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत विजय वडेट्टीवार यांचे नाव सुद्धा चर्चेत होते. मात्रस, प्रदेशाध्यक्ष पदाची माळ आता नाना पटोले यांच्या गळ्यात पडणार असल्याचे जवळजवळ निश्चित झालेले आहे. त्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनादेखील बढती देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. यावर वडेट्टीवार यांना विचारले असता, त्यांनी या संदर्भात काहीही माहिती नसल्याचे सांगून उत्तर देणे टाळले.
इंधनावरील राज्याने कमी करावे आणि केंद्राने वाढवावे -
इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. पेट्रोलचे दर तर प्रति लिटर शंभर रुपयांच्या जवळ जाऊन पोहोचल्याने सर्वसामान्यांनी या विरोधात ओरड करायला सुरुवात केली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याकरिता राज्य सरकारने इंधनावरील कर कमी करावा, असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना, केंद्राने आपले कर वाढवत जावे आणि राज्याने ते कमी करावे हा कुठला न्याय. राज्याने आपल्या राज्याचा कारभार चालवायचा कसा, असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. केंद्रानेच कर कमी करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा, त्यावेळी राज्य सरकारदेखील या संदर्भात सकारात्मक निर्णय घेईल, असेही ते म्हणाले.
भाजप नेते केंद्राविरुद्ध केव्हा आंदोलन करणार -
लॉकडाउनच्या काळात सामान्य जनतेला आलेल्या वाढीव वीजबिलचा विरोध करत आज भारतीय जनता पक्षाकडून राज्यभरात 'हल्ला बोल' आंदोलन केले जात आहे. यासंदर्भात वडेट्टीवार यांनी राज्यातील भाजप नेत्यांना खडे बोल सुनावले आहेत. पेट्रोल डिझेल आणि घरगुती वापरातील गॅसचे दर गगनाला जाऊन भिडले असताना राज्यातील भाजपचे नेते वीज दरवाढीच्या मुद्द्यावर आंदोलन करू बघत आहे. मात्र, राज्यातील जनता खुळी नाही. त्यामुळे त्यांना भाजपची नाटकं समजून आलेली आहे. एकीकडे विजेचे दर कमी करावे, याकरिता भाजप आंदोलन करत आहे, तर दुसरीकडे इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढत असताना भाजप नेते केंद्राविरुद्ध केव्हा आंदोलन करणार, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा - मेहुल चोक्सीची 14 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने केली जप्त