मुंबई : सुप्रसिद्ध गीतकार देव कोहली यांचं मुंबईत निधन झालं. 81 वर्षांचे देव कोहली गेले काही यांची प्रकृती गेले काही महिने अस्वस्थ होती. त्यांच्यावर कोकिलाबेल अंबानी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यानच या प्रतिभासंपन्न गीतकाराचं निधन झालं. गीतलेखनला 'पॅशन' मानणारे देव कोहली अविवाहित होते.
प्रतिभासंपन्न गीतकार : देव कोहली यांनी अनेक हिंदी चित्रपटांसाठी गाणी लिहिली. यात मैने प्यार किया, बाजीगर, जुडवा, मुसाफीर, शूट ऑऊट अॅट लोखंडवाला, टॅक्सी नंबर 9-2-11 आदी गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. राम लक्ष्मण, अनु मलिक, आनंद राज आनंद, आनंद- मिलिंद या संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी केलेली गाणी विशेष स्मरणीय ठरली. त्यांच्या कुवत आणि प्रतिभेला साजेशा संधी त्यांना चित्रपटसृष्टीत मिळाल्या नाहीत.
आज मुंबईत होणार अंत्यसंस्कार : देव कोहली यांचं पार्थिव आज दुपारी दोन वाजता त्यांच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
'बँकेत' भेटलेला 'देव' पोरकं करुन गेला - आनंद राज आनंद : 'देव कोहली यांच्या निधनाची धक्कादायक बातमी येऊन धडकली अन् काळजात चर्र झालं. मला जुने दिवस आठवले, तेव्हा म्हणजे साधारण 1995 च्या दरम्यान मी मुंबईत आलो होतो. मी काही गाणी केली होती, त्याचे पैसे मिळाल्यानं मी लोखंडवालामधील बँकेत खातं उघडण्यासाठी गेलो. बँकेत खातं उघडण्यासाठी कोणीतरी परिचित असणं गरजेचं होतं. मी मुंबईत नवीन असल्यानं कोणी ओळखीचं असण्याची शक्यताच नव्हती. मात्र यावेळी माझ्या मागं रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तीनं 'बेटा मी होतो तुझा गॅरेंटर' असं सांगितल्यानं मी चकितच झालो. मी त्यांना म्हणालो, 'तुम्ही तर मला ओळखत पण नाही, मग माझ्या परिचयपत्रावर सही कशी करणार? त्यावर त्यांनी मला तू संगीतकार आहेस अन् मी गीतकार मग काय अडचण आहे असं म्हणत मला दिलासा दिला. मला हे ऐकून धक्काच बसला. म्हणून मी त्यांना तुमचं नाव काय असं विचारलं, तर त्यांनी देव कोहली हे नाव सांगितलं. नाव ऐकताच मी त्यांना चरणस्पर्श केला', ही माझी देव कोहली यांच्याशी झालेली पहिली भेट असल्याचं आनंद राज आनंद यांनी सांगितलं. तेव्हा सोशल मीडिया किवा सेलफोन नव्हते. म्हणून त्यांनी त्यांचा मेल आयडी दिला. आम्ही दोघंही पंजाबी होतो, मग काय आम्ही अनेक गाणी एकत्र केली. देव कोहली यांनी तब्बल 70 टक्के काम माझ्यासोबत केलं. देव कोहली हे राधाकृष्णांचे परणभक्त होते, मात्र तरीही त्यांनी टनटनाटन टनटन तारा, चलती है क्या नौ से बारा, अशी सुपर हिट गाणी चित्रपटसृष्टीला दिल्याचं' आनंद राज आनंद यांनी स्पष्ट केलं. 'वय झाल्यामुळे ते प्रचंड अशक्त झाले होते'. मात्र मागच्या आठवड्यातच मी त्यांच्या घरी जाऊन भेटून आलो. यावेळी त्यांना मी त्यांच्या आवडीची भजनं तब्बल एक तास ऐकवल्याचंही आनंद राज आनंद यांनी यावेळी सांगतिलं. तू पुन्हा काम सुरु कर, म्हणून त्यांनी मला सांगितल्यानंच मी पुन्हा काम सुरु केल्याचंही सांगताना आनंद राज आनंद भावूक झाले होते.
देव कोहली नावासारखाच ग्रेट माणूस गेल्यानं दु:ख झालं : देव कोहली यांच्यासोबत आम्ही अनेक चित्रपटात काम केलं आहे. त्यांनी गीतलेखनाचं अतिशय चांगलं काम केलं होतं. खूप कमी लोकांना चित्रपटसृष्टीत असं काम करता येते. मात्र तरीही त्यांना पाहिजे तसं यश मिळालं नसल्याची खंत आनंद-मिलिंद या जोडगोळीतील संगीतकार मिलिंद यांनी व्यक्त केलं. देव कोहली यांच्या निधनानं मला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्यासोबतच्या माझ्या अनेक आठवणी आहेत. अभिनेता मिथुन चक्रवर्ती आणि आम्ही सोबत काम करत असताना अनेक क्षण साजरे केले आहेत. ते सर्व आता आठवतंय. 'कामात कोणतंही राजकारण न आणणारा, आपल्या कामाशी इमान राखणारा गीतकार' अशी त्यांची ओळख कायम मनात राहील, अशा शब्दांत संगीतकार मिलिंद यांनी यावेळी ईटीव्ही भारतकडं भावना व्यक्त केल्या.