मुंबई: राज्यात उद्योग येत नाही असा विरोधकांकडून बागुलबुवा उभा केला जात आहे. त्याला आता सरकारने चूक उत्तर द्यायचे ठरवले आहे. 3 वर्षांपूर्वी राज्यात सीनोरमस हा प्रकल्प येणार होता. मात्र तत्कालीन मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याबाबत निर्णय होऊ शकला नाही. त्याला आज आम्ही परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यात आता दहा हजार पाचशे कोटी रुपयांचा प्रकल्प येणार आहे. 300 एकर जमिनीचे त्यासाठी आम्ही वितरण केले आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.
2000 थेट रोजगार उपलब्ध: या प्रकल्पातून पहिल्या टप्प्यात 2000 थेट रोजगार उपलब्ध होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात 3 हजार रोजगार उपलब्ध होतील असा दावा सामंत यांनी केला आहे. तसेच येत्या 2 महिन्यात 40 ते 50 हजार कोटींचे प्रकल्प राज्यात येणार आहेत. डावसला देखील आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट कसे येतील. यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सावरकर हा देशाचा अभिमान: स्वातंत्र्यवीर सावरकर हा देशाचा अभिमान आहे राज्याचा अभिमान आहे. काही माजी आमदार या संदर्भात बोलताय ती राहुल गांधी यांची भाषा ते बोलत आहेत. सध्या कोणीही उठावे आणि सावरकरांवर टीका करावी, असा ट्रेंडच आला आहे. त्यांनी यावेळी सांगितले की, संजय राऊत हे दररोज पत्रकार परिषद घेतात त्यांच्या आरोपांना उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही असेही ते म्हणाले.
कर्नाटकच्या संघटनांनी आव्हान देऊ नये: महाराष्ट्रातील जनता अत्यंत संयमी आहे. या जनतेला कर्नाटकातील काही संघटना आव्हान देऊ पाहत आहेत. या संघटनांनी महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान देऊ नये. महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचा वारसा जपणारा आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये कसे वागायचे, हे सर्वांनाच कळते असा टोला उदय सामंत यांनी लगावला. तसेच अक्कलकोट सोलापूर इथली गाव देण्याचा विषय येत नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.