मुंबई - सांगलीत 'टप्प्यात आल्यावर' राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यक्रम केला, आणि आता जळगावात शिवसेनेने भाजपाची सत्ता उलथवून लावत महापिलेकवर महापौर निवडून आणल्याने भाजपाला ओहोटी लावल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केले आहे.
सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपाचा 'टप्प्यात कार्यक्रम' करत राष्ट्रवादीचा महापौर केला आणि आता जळगावात शिवसेनेने भाजपाची सत्ता उलथवून लावली आहे. जळगावात आज शिवसेनेने भगवा फडकवला असून भाजपाचा उधळलेला वारु आता ओहोटीच्या रुपात दिसू लागला असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे, असेही महेश तपासे म्हणाले. तसेच भाजप महाविकास आघाडी वर कितीही आरोप लावत असली, तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जनता ही महाविकास आघाडीच्या मागेच उभी आहे हे सत्य भाजप नाकारू शकत नाही. म्हणूनच जळगाव च्या महापौरपदी शिवसेनेचे उमेदवार जिंकून आले आहेत, असे मत महेश तपासे यांनी व्यक्त केले. जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचा उमेदवार निवडून यावा, यासाठी भाजपने पूर्ण ताकद पणाला लावली होती. मात्र एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपच्या ताकदीला जळगावात छेद गेला होता. त्यामुळे शिवसेनेने त्याचा उपयोग करत आपला महापौर जळगाव महानगरपालिकेच्या पदी विराजमान केला आहे.
हेही वाचा - 'आयडॉल'चा सुवर्णमहोत्सवी पदवीदान समारंभ; उदय सामंत यांची उपस्थिती