मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटाच्या सर्व आमदार, खासदार नेत्यांना घेऊन अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. दौऱ्यात भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाल्याने शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली. आजवर महाष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते गेल्या अनेक वर्षांत अयोध्येला गेल्याचे पाहिले नाही. आम्ही सातत्याने जात आलो आहोत. तेव्हा भाजपवाले आमच्या सोबत कधीही नव्हते. येथे श्रीराम मंदिर व्हावे, यासाठी शिवसेनेने संघर्ष केला आहे. अयोध्येत जाणे वेगळा आनंद असतो. परंतु, आता गेलेले श्रीरामाचे सत्य वचन कुठून आणणार, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला.
यांच्या डोक्यातला किडा नवा नाही: महाराष्ट्रात मागील ७२ तासात गारपिटीने शेतकऱ्यांचे नुकसान झाल आहे. सरकारने अधिवेशनकाळात काही घोषणा केल्या होत्या. मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून धर्माच्या नावाने पर्यटनाला निघाले असून हे ढोंग आहे. लवकरच उघडे पडेल. आता शिंदे सरकारला अयोध्येतील साधू संतांचे आशीर्वाद देत आहेत. कालपर्यंत त्यांचा आशीर्वाद बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंना होता. शिंदे गटाकडून बेईमानी, सत्तेची बीजे मागील साडे तीन वर्षांपासून रुजवली जात होती. माझ्या माहितीप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण असतानाही हा प्रकार सुरू होता. तेव्हा काही बैठका देखील झालेल्या. यांच्या डोक्यातला किडा नवा नसल्याचे संजय राऊत म्हणाले.
जेपीसीच्या मागणीवर कायम: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डीग्रीवरुनही संजय राऊत यांनी निशाणा साधला. खोटी डिग्री ही काही प्रतिष्ठेचे लक्षण नाही. त्यांच्या त्या भूमिका असू शकतात. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेकांनी गोष्ट समोर आणल्या आहेत, असे राऊत म्हणाले. गौतम अदानीच्या मुद्द्यावरुनही संजय राऊतांनी प्रश्न उपस्थित केला. अदानी यांच्यावरुन प्रश्न जे उपस्थित झाले आहेत. त्याचे सत्य समोर येणे गरजेचे आहे. आमची जेपीसीची मागणी कायम आहे. शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत, त्यांची वेगळी मते आहेत. उद्योगपतींना स्वातंत्र्य दिले पाहिजे, त्यांची लिबरल भूमिका आहे. मात्र त्याचा अर्थ असा नाही ना की त्यांच्या भ्रष्टाचाराला पाठिंबा दिला पाहिजे. अदानी संबंधी चौकशी प्रकरणी त्यांनी विरोध केला नसल्याचे संजय राऊत म्हणाले.