मुंबई - भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आरक्षण कायद्याच्या विरोधात व मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, यासाठी दोन्ही बाजूने खेळत आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आज महाविकास आघाडी सरकारची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा - 'उद्धव ठाकरे यांचे खायचे अन् दाखवायचे दात वेगळे'
फडणवीस यांच्यामुळेच आरक्षण रखडले
मराठा आरक्षण मिळायला हवे, या भूमिकेत राज्यसरकार आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस सपशेल खोटे बोलत आहेत. आपल्या पैशाने न्यायालयात वकील पाठवत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणातही माजी पोलीस आयुक्तांना दिलेला वकील भाजपशी संबंधित आहे. न्यायालयीन लढाईसाठी देवेंद्र फडणवीस यांची फूस होती, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला. आघाडी सरकार मराठा समाजाला आरक्षण देवू शकत नाही, असे देवेंद्र फडणवीस वारंवार बोलत होते. आज जे वकील न्यायालयात लढत आहेत त्याला पाठबळ भाजपचे आहे आणि महाराष्ट्र अशांत करण्याचे कामही भाजप करत आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.
हेही वाचा - कोरोनाचा फटका : देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या 40 टक्क्यांनी घसरली