कोल्हापूर - शहरातील शिवाजी पुलाचे काम पुन्हा एकदा रखडण्याची चिन्हे दिसत आहेत. पुरातत्व विभागाला जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येणारी जागा अद्यापही दिली नसल्याने पुरातत्व विभाग हे काम बंद करण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकारावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा, अन्यथा मी आंदोलनाचा कोणताही पर्याय निवडेल असा इशारा संभादीराजेंनी दिला आहे.
गेले ८ वर्ष वेगवेगळ्या कारणांनी शिवाजी पुलाचे काम रखडले आहे. जुन्या शिवाजी पुलावरुन कोकण आणि घाटमाथ्याला जोडणारी वाहतूक सुरू आहे. पावसाळ्यात जुन्या शिवाजी पुलाला धोका असल्याने ही सर्व वाहतूक थांबवण्यात येते. त्यामुळे शिवाजी पुलाचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. आता शिवाजी पुलासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. हे काम पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा, अन्यथा मी आंदोलनाचा कोणताही पर्याय निवडले असा इशारा संभाजाराजेंनी दिला आहे. पर्यायी पुलाचे सुरू असलेले बांधकाम बेकायदेशीर आहे. ते बांधकाम ७ दिवसात काढून घ्या, अशी नोटीस भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना 25 एप्रिल रोजी बजावली आहे. मुदतीत बांधकाम हटवले नाही, तर पुरातत्त्व विभागाच्या कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यामुळे पर्यायी पुलाचा प्रश्न पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.