बदनापूर - जिल्हाभरात जमावबंदी असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व वाहतूक बंद आहे. त्याचप्रमाणे जिल्हाभरात पेट्रोल-डिझेलही अत्यावश्यक सेवा वगळून बंद असतानाही अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरूच असल्याचे चित्र असून बदनापूर पोलिसांनी आज हायवा ट्रक पकडून गुन्हा दाखल केला आहे.
जालना-औरंगाबाद महामार्गावर बदनापूरपासून जवळच असलेल्या वरुडी या गावाजवळ आज (18 एप्रिल) सकाळी 11 वाजता पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील व पथक हे जमावबंदी आदेशाचे पालन करत गस्त घालत असतानाच एक विना क्रमांकाचा हायवा अवैधरित्या उत्खनन बंद असताना वाळू भरून वाहतूक करता आढळून आला. विशेष म्हणजे या हायवाचा क्रमांक ओळखू येऊ नये म्हणून क्रमांक लिहिलेल्या पाटीवर खाडाखोड करून क्रमांक ओळखता येऊ नये, असे केलेले आहे.
या वाहनामध्ये असलेल्या अवैध उत्खननामुळे पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी हायवा ताब्यात घेऊन थेट पोलीस ठाण्यात आणला. यावेळी पोलिसांच्या वतीने सय्यद अफसर सय्यद अजगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून हायवा चालक उद्धव व धोंडीराम शिंदे व विठ्ठल भाऊसाहेब शिंदे (दोघे रा. वरुडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मारूती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन ढिलपे हे करत आहेत.