जालना - ब्रिक्स इंडिया लि. कंपनीला जिल्ह्यातील बसस्थानक आणि आगार तसेच या संबंधित असलेल्या कार्यालयांमधील स्वच्छतेची कामे दिली होती. बस धुण्यापासून बसस्थानकातील वाहक चालकांच्या विश्रांती कक्षाच्या स्वच्छतेपर्यंत सर्व कामे करुन घेतली जात होती. मात्र, या कंपनीचे राज्य परिवहन महामंडळाकडे 65 लाख रुपये थकले आहेत. पर्यायाने या कंपनीच्या जालना येथील 64 कामगारांचे वेतन थकले आहे. यामुळे या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी काम बंद केले आहे. यामुळे बसस्थानक परिसरात आता घाणीचे साम्राज्य वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या प्रकरणासंदर्भात जालना राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक उद्धव वावरे यांनी याविषयी ही कुठलीही माहिती दिली नाही. मात्र, प्राप्त माहितीनुसार जे सफाई कर्मचारी ब्रिक्स इंडिया कंपनीमध्ये काम करत होते. त्यांच्याकडूनच रोजंदारीच्या स्वरूपात बसस्थानकातील कामे करून घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.
हेही वाचा - 'कोणाची व्यक्तिगत विधाने सरकारची असू शकत नाहीत'
अशा प्रकारे कंपनीच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती -
जालना राज्य परिवहन महामंडळाच्या विविध ठिकाणच्या विभागांमध्ये 63 कर्मचारी आणि एक व्यवस्थापक असे सध्या 64 कर्मचारी ब्रिक्स इंडिया कंपनीने नियुक्त केले होते. जालना 22, राजुर 2, भोकरदन 3, जाफराबाद 6, अंबड 13, शहागड 1, घनसावंगी 1, परतूर 12, मंठा 1, याप्रमाणे कर्मचारी कार्यरत होते.
हेही वाचा - राजाला पुरावा मागितलाच तर त्यांनी तो द्यावा - लक्ष्मण माने
ऑक्टोबर 2017 मध्ये या कंपनीला हे काम मिळाले. तेव्हा एक बस धुऊन स्वच्छ करणे, काचा पुसणे, अंतर्गत सफाई करणे यासाठी 120 रुपये दिले जात होते. ते आता 132 रुपयापर्यंत गेले आहेत. कदाचित हा खर्च एसटी महामंडळाला झेपत नसावा त्यामुळे आता हे काम रा. प. स्वतः रोजंदारीवर कामगार घेऊन एक बस झाडण्यासाठी 12 ते 15 रुपये देणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाने काढलेल्या आदेशानुसार आता संबंधित कंपनीचे स्वच्छतेवरील देयक त्या-त्या विभागाने उत्पन्न वाढवून परत करावे, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे दरमहा 10 ते 15 लाखांचा खर्च कसा भरून काढायचा हा एक प्रश्न राज्य परिवहन महामंडळा समोर उभा आहे.