चंद्रपूर - जिल्ह्यामध्ये भात, कापूस या पिकाव्यतिरिक्त भाजीपाला, फळे, आणि फूल पिकांच्या क्षेत्रांमध्ये वाढ करावी, अशा सूचना कृषीमंत्री दादा भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. कृषी संजीवनी सप्ताह निमित्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी ते चंद्रपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्हा कृषी विभाग आणि कृषी संलग्नित विभागांचा आढावा घेतला.
खरीप हंगामात उपलब्ध होणारे पीक कर्ज, बियाणे- खते, विविध सिंचन प्रकल्पातील पाणी उपलब्धता, प्रधानमंत्री पिक विमा योजना याबाबत त्यांनी माहिती घेतली. जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पातील जलसाठा काटेकोरपणे वापरावा. खरीप आणि रबी हंगामातील पिकास सिंचन प्रकल्पातील पाण्याचा वापर करावा, अशा सूचना मंत्री भुसे यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी जिल्हा कृषी विभागाच्या नियोजन विषयीचे सादरीकरण केले. मनरेगा फळबाग योजनेतून फळबाग लागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा कृषी विभागाचे नियोजन आहे. या वर्षी एप्रिल, मे महिन्यापासून खते -बियाणे शेताच्या बांधावर राबविण्याचे अभियान चांगले परिणामकारक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - 'महाविकास आघाडीत बिघाडी नाही, पण काही लोक आघाडीत बिघाडी होण्याची वाट पाहात आहेत'
पीएम किसान योजनेतंर्गत सध्या समाविष्ट शेतकरी तसेच आणखी उर्वरित समाविष्ट करायचे शेतकरी बाबतची माहितीही जिल्हाधिकारी यांनी दिली. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी राहुल कर्डिले, विभागीय कृषी सह संचालक नागपूर रविंद्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी शंकर किरवे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सोमनाथे, जिल्हा अग्रणी बँकेचे समन्वयक एस. एन. झा उपस्थित होते.