औरंगाबाद : कोरोना लसीकरण मोहीम नवीन वर्षात बंद पडल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. मागील वर्षीचा असलेला लसींचा साठा कालबाह्य झाल्याने, तो नष्ट करण्यात आला. त्यामुळे 1 जानेवारीपासून ते 10 जानेवारी या काळात लसीकरण मोहीम पूर्णत बंद ठेवण्यात आली होती. याबाबत महानगरपालिका आरोग्य विभागाने राज्य सरकारला माहिती देखील दिली असून, पन्नास हजार लसींचा मागणी करण्यात आली होती. मात्र लस उपलब्ध नसल्याने आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर इतरत्र असलेल्या लसींचा डोस मिळवण्याची हालचाली केल्या आणि अवघ्या 160 लस प्राप्त झाल्या. या देखील एक ते दोन दिवसात संपतील आणि पुन्हा लसीकरण मोहीम बंद पडेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
लसींची मागणी वाढली : मागील काही महिन्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने, नागरिकांनी कोरोना चाचणी आणि लसीकरण दोन्हीकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. मात्र काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आरोग्य यंत्रणांनी वर्तवल्यानंतर नागरिक आरोग्य तपासणीसाठी येत आहेत. इतकच नाही तर कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी विचारणा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. काही जणांचा दुसरा तर काहींचा बूस्टर डोस शिल्लक असल्याने, लसीकरण करून घेण्यासाठी नागरिक येत आहेत. शहरात सध्या तीन ठिकाणी लसीकरण मोहीम सुरू असून मागणी वाढल्यास इतरत्र देखील लसीकरण सुरू होईल असे महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले.
आरोग्य यंत्रणा सज्ज : औरंगाबाद महानगरपालिका हद्दीत एक कोरोना सक्रिय रुग्ण असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आरोग्य यंत्रणा किती सज्ज आहे, याबाबत तपासणी करण्यात आली. रुग्ण आल्यावर किती वेळात त्याच्यावर उपचार सुरू होतील. ऑक्सिजन उपलब्धता, व्हेंटिलेटरची उपलब्धता या सर्व यंत्रणा तपासण्यात आल्या, सध्या कोरोना आटोक्यात असला तरी आरोग्य यंत्रणा मात्र पूर्णपणे सज्ज असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.