औरंगाबाद - जिल्ह्यात चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा मुसळधार पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून जात असल्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पहावयास दिसत आहे.
दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या मराठवाड्यात जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस झाला. खरीप पिकाच्या पेरणीच्या वेळेस पावसाचे यंदा आगमन झाले. दुष्काळ आणि कोरोनाच्या काळात टाळेबंदीच्या परिस्थितीशी सामना करणाऱ्या शेतकऱ्याला काहीसा दिलासा मिळाला. चांगला पाऊस झाल्याने यंदा शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, गेल्या एक महिन्यापासून पैठण तालुक्यासह मराठवाड्यात सतत पाऊस सुरू आहे. बाजरी, मका, सोयाबीन, मूग, आणि कापसाची पिके सततच्या पावसाने आडवी पडली आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
हेही वाचा-विदर्भातील 'या' भाजपा आमदाराने घेतला वरळीत 42.5 कोटींचा फ्लॅट
एकीकडे, कोरोनासारखे महामारीचे संकट तर दुसरीकडे ओल्या दुष्काळचे संकट ओढवल्याने शेतकरी हतबल झाला आहे. पैठण तालुक्यातील बालानगर, दावरवाडी, नांदर, हर्षी, थेरगाव, दादेगाव, थेरगाव, मुरमा व लिंबगाव आदी परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणचे पूल खचले आहेत. तर कापूस, बाजरीचे पावसाच्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा-लातुरात भाजप-काँग्रेस समोरासमोर; एकीकडे कृषी कायद्याला विरोध तर, दुसरीकडे समर्थन