‘आई कुठे काय करते’ ही मालिका जरी हिंदी मालिका ‘अनुपमा’ चा रिमेक असला तरी तिने आपले मराठीपण जपले आहे. स्टार प्रवाहवरील या मालिकेचं कथानक दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होत आहे. सध्या मालिकेत अनघा आणि अभिषेकच्या साखरपुड्याची धामधूम सुरु असताना संजनाच्या येण्याने आनंदात विरजण पडलं आहे. शुभकार्यात विघ्न आणण्याचा संजनाचा मनसुबा आहे. संजनाच्या या कारस्थानाविषयी कळताच अरुंधतीने माझ्या संसारात ढवळाढवळ केलीस मात्र माझ्या मुलांच्या वाटेला जायचं नाही असं म्हणत संजनाच्या कानशिलात लगावली आहे.

अनिरुद्ध आणि संजना प्रकरणामुळे जरी अरुंधतीने घटस्फोटाची तयारी केली असली तरी संजनाने घरातील कुठल्याही गोष्टींत ढवळाढवळ करू नये असे तिने तिला बऱ्याचदा बजावले आहे. तरीही, ‘कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच’ असे संजनाचे वागणे राहिले आहे. भले तिने आपला नवरा बळकावला असला तरी संजनाची सावलीही आपल्या मुलांवर पडू नये अशी अरुंधतीची नेहमीच इच्छा राहिली आहे. त्यामुळेच तिच्या हातून संजनाला ‘प्रसाद’ मिळतो.

अरुंधतीचं हे रौद्ररुप संजनासाठी नक्कीच धक्कादायक आहे. पण जेव्हा जेव्हा आपल्या मुलांच्या सुखाचा प्रश्न असतो तेव्हा आईची कसोटीही लागतेच. आजवर स्वत:चं दु:ख बाजूला ठेऊन अरुंधतीने मुलांच्या सुखाचाच विचार केला आहे. म्हणूनच मुलांच्या सुखाआड येऊ पाहणाऱ्या संजनाला अरुंधतीने खणखणीत उत्तर दिलं आहे. अरुंधतीच्या या खणखणीत उत्तरावर संजनाची प्रतिक्रिया काय असणार हे पहाणं उत्सुकतेचं असणार आहे.
‘आई कुठे काय करते’ ही मालिका स्टार प्रवाहवर प्रसारित होते.
हेही वाचा - राष्ट्रीय पुरस्कार विजेती "तेंडल्या" चित्रपटाची टीम कर्ज फेडण्यासाठी करतेय शेती