लॉकडाऊन शिथिल झाल्यावर मालिकांचे चित्रीकरण आता महाराष्ट्रात पुन्हा सुरु झालंय. ‘कारभारी लयभारी’ ही मालिका सुद्धा ‘माहेरी’ परतली असून या मालिकेत अनेक वळणं दिसून येताहेत. महाराष्ट्रातील राजकारणावर बेतलेल्या या मालिकेने सुरुवातीपासून प्रेक्षकांच्या मनात घर करायला सुरुवात केली होती. या मालिकेच्या निमित्ताने निखिल चव्हाण आणि अनुष्का सरकटे ही फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर आली. या मालिकेची कथा तेजपाल वाघ यांची असून विशाल कदम यांनी या मालिकेचे देखील संवाद लिहिले आहेत तर पटकथा स्वप्नील गांगुर्डे याची आहे. “डोळ्यात जाळ हाय, दुश्मनाचा काळ हाय काळीज कापतंय नजरेची सूरी, आला आला कारभारी लयभारी…!” हे गाणं विशेष गाजलं.
राजवीरचे वडील त्या गावचे कारभारी होते आणि त्यांचा पक्षात, राजकारणात आणि विरोधकांसमोर एक दरारा होता. काकी, वीरु आणि त्याच्या आईला ज्या पद्धतीने वागवते ते पाहून पियू ठरवते की या घरात त्या दोघांना त्यांचा मान मिळवून द्यायचा. त्याचप्रमाणे राजवीरने सुद्धा गावच्या भल्यासाठी सक्रिय राजकारणात काम करावं यासाठी पियू वीरूच नाव आमदारकीच्या निवडणुकीसाठी पुढे करते. पण वीरू काकीमुळे या निवडणुकीतून माघार घेण्याचं ठरवतो. पण आता काकीचा खोटारडेपणा वीरूच्या समोर येणार असून आता काकीला धडा शिकवण्यासाठी तो निवडणुकीला उभा राहणार आहे.
वीरू म्हणजेच अभिनेता निखिल चव्हाण म्हणाला, "वीरू त्याच्या काकीला खूप मानतो आणि त्यांचा कुठलाच शब्द तो खाली पडू देत नाही. पण खोटारडेपणा वीरूला अजिबात आवडत नाही आणि आता काकीचा खोटारडेपणा त्याचा समोर आल्यामुळे वीरू त्यांच्या नाकावर टिचून राजकारणात उतरणार आहे. आता मालिका अजून उत्कंठावर्धक होणार असून मी राजकारण्याची भूमिका साकारण्यासाठी खूप उत्सुक आहे."