पुणे - डी.एस.कुलकर्णी या व्यासयायिकाकडे गुंतवलेले पैसे परत मिळण्याची आशा नसल्याचे पत्र लिहून एका ठेवीदाराने आत्महत्या केली आहे. तानाजी गणपत कोरके (वय-60) असे आत्महत्या करणाऱ्या नागरिकाचे नाव आहे. गुरुवारी (16 जानेवारी) राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी आयुष्य संपवले. आत्महत्या करण्यापूर्वी पत्र लिहून यामागील कारण त्यांनी सांगितले आहे. ते रिक्षा चालवायचे. मुंढवा परिसरात ते कुटुंबियांसह राहत होते. कोरके यांना चार मुली असून यातील तिघींची लग्न झाली आहेत. आर्थिक विवंचना तसेच चौथ्या मुलीचे लग्न होत नसल्यामुळे मागील काही दिवसांपासून ते नैराश्यात होते.

तानाजी कोरके यांनी लिहिलेल्या पत्रात त्यांनी गावाकडील अडीच एकर जमीन विकून आलेले चार लाख रुपये स्वतःच्या नावावर तर आपत्यांच्या शिक्षणासाठी 50 हजार रुपये जावयाच्या नावावर डी एस कुलकर्णी डेव्हलपर्समध्ये गुंतवले होते. या गुंतवणुकीची मुदत 2017 मध्ये संपूनही पैसे परत मिळाले नाही. सतत चकरा मारल्यानंतरही पैसे मिळत नसल्याचे त्यांनी या चिट्ठीत नमूद केले आहे.

नातेवाईकांकडून पैसे उसने घेऊन त्यांनी तिसऱ्या मुलीचे लग्न केले. परंतु चौथ्या मुलीच्या लग्नासाठी पैसे नसल्याचे त्यांनी या चिट्ठीत नमूद केले आहे. तसेच मी गुंतवणूक केलेले पैसे माझ्या वारसांना देण्यात यावे आणि त्यातून तिचे लग्न करण्यात यावे, तेव्हाच माझ्या आत्म्याला शांती मिळेल, असे त्यांनी लिहिले आहे. तसेच माझ्या आत्महत्येप्रकरणी डी एस कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, असेही त्यांनी या चिट्ठीत म्हटले आहे.

माझ्या अंत्यसंस्काराची जबाबदारी माझे मित्र आणि मेहुण्यावर सोपवावी. मी मित्र संतोष घोडके यांना अंत्यविधीसाठी लागणाऱ्या खर्चासाठीचे पैसे दिले आहेत. त्यांना कोणताही पोलीसी त्रास होऊ नये. तसेच मी काय करणार आहे, हे त्यांना माहिती नाही. त्यामुळे त्यांच्यावर कसलाही संशय घेऊ नये. अशी शेवटची इच्छा असल्याचे त्यांना म्हटले आहे. तसेच अशी वेळ इतरांवर येऊ नये, हीच प्रार्थना मी सरकारला करत आहे, असे ते म्हणाले. शेवटी त्यांनी सुरवातीपासूनच शिवसैनिक असल्याचे नमूद केले आहे.