मुंबई - आटोक्यात आलेल्या कोरोनाने राज्यात पुन्हा डोके वर काढले आहे. मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये रुग्णवाढीचा दर अधिक आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने तपासणीचा वेग वाढवला आहे. दिवाळी तोंडावर आल्याने रुग्ण वाढीला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. राज्यात सध्या बीए. २. ७५ चे विषाणूचे प्रमाण ९५ टक्क्यांवरुन ७६ टक्क्यापर्यंत खाली आले आहे. मात्र, दोन दिवसांपासून चीनसह अन्य देशांमध्ये आढळून येणाऱ्या एक्सबीबी. या नव्या घातक विषाणूंचा संसर्ग राज्यात दिसून आला आहे. हा विषाणू घातक असून अतिशय वेगाने पसरतो. मानवी आरोग्यावर याचे विपरीत परिणाम होत आहेत. याच शिवाय, बीए. २.३. २० आणि बीक्यू. १. हे दोन नवे व्हेरीयंट देखील आढळून आले आहेत. मात्र, एक्स बीबी पेक्षा या विशाणूंचा धोका अतिशय कमी असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
आरोग्याची काळजी घ्या - राज्यात एक्सबीबी हा विषाणू आढळून आला आहे. आतापर्यंत केवळ चार रुग्ण सापडले आहेत. हा विषाणू अधिक वेगाने पसरतो. या विषाणूमुळे १७ टक्के वाढतील. आरोग्यावरही याचा परिणाम होईल. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन साथरोग सर्वेक्षण अधिकारी प्रदीप आवटे यांनी सांगितले. तसेच, दिवाळी सोबतच हिवाळा येणार आहे. थंडीच्या दिवसांत नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असेही डॉ. आवटे म्हणाले.