मुंबई - परळ येथे निवासाअभावी रस्ते, पदपथावर राहणाऱ्या कॅन्सरग्रस्त रुग्णांना आठवडाभरातच घरे दिली जातील. या बाबत माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटवरुन दिली आहे. या बाबत गृहनिर्माण विभाग व टाटा मेमोरियल रूग्णालय यांच्यामध्ये लवकरच कारारनामा केला जाईल, असे ते म्हणाले.

येत्या आठवड्यात कार्यक्रम -
टाटा मेमोरियल रुग्णालय हे कँन्सरच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी नावाजलेले रुग्णालय आहे. या रुग्णालयात महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपुर्ण भारतातून कँन्सरग्रस्त उपचारासाठी येतात. रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईक येतात. नातेवाईकांना राहण्याची व्यवस्था नसते. खासगी निवासस्थानही परवडत नाहीत. परिणामी मुंबईतील फुटपाथवर राहावे लागते. या रुग्णांच्या नातेवाईकांना म्हाडाकडून घरे उपलब्ध करुन देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला होता. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती त्यांनी ट्विटवरुन दिली.
ते म्हणाले की, पवारांनी कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांना जी घरे द्यायची होती, त्याच काय झाले, असा प्रश्न विचारला. घरे तयार आहेत. चाव्या देखील हातात असून केवळ त्यांना देणे बाकी आहे. तुमचा वेळ हवाय, असे आव्हाड म्हणाले. यावर उशीर कशाला, या आठवड्यामध्ये हा कार्यक्रम करुन टाकू या असे सांगत त्यांना प्रथम घरे द्या, अशा सूचना केल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटवरुन सांगितले.
टाटा हॉस्पिटलकडे अधिकार -
कँन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांना घरे मिळणार आहेत. ३०० चौरस फुट असलेले १०० फ्लॅट टाटा मेमोरियल रूग्णालयास उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या घरांच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी टाटा मेमोरियल रूग्णालयाला देण्यात आली आहे. गृहनिर्माण विभाग व टाटा मेमोरियल रूग्णालय यांच्यामध्ये लवकरच कारारनामा केला जाईल, असे आव्हाड म्हणाले.