कोल्हापूर - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ईटीव्ही भारतच्या बातमीची दाखल घेत कर्नाटकात प्रवास करण्यास राज्य महामंडळच्या बसेसना परवानगी दिली आहे. आज साडेचार वाजता कोल्हापूर-बेळगाव बससेवा सुरू करण्यात आली, अशी माहिती कोल्हापूर विभागीय मंडळातील डिटीओ शिवराज जाधव यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादानंतर दोन्ही राज्याकडून एसटी सेवा बंद केली होती. मात्र, कर्नाटक सरकारने त्यांच्या एसटीला महाराष्ट्रात प्रवास करण्यास परवानगी दिल्याने कर्नाटक एसटी अक्षरशः महाराष्ट्रातील प्रवासी ओढून नेट होते. त्यावर' ईटीव्ही भारत' ने 'कर्नाटकने प्रवासी पळवले, महाराष्ट्र चीडीचूप' अशी बातमी प्रसारित केली होती. त्याची दखल घेत आज एसटी महामंडळाकडून कर्नाटक राज्यात बेळगाव मार्गावर ४.३० वाजल्या पासून एसटी सुरू केली आहे.
ईटीव्ही भारतने प्रसारित केलेली बातमी -
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादानंतर दोन्ही राज्यातील एसटी वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, कर्नाटक सरकारने या वादाला भीक न घालता एसटीची वाहतूक सुरू केली आहे. त्यामुळे कर्नाटक सरकार महाराष्ट्र राज्यातील प्रवासी पळवून नेत असताना महाराष्ट्र राज्य सरकारने अद्याप फक्त बघ्याची भूमिका घेतली आहे. कोरोना काळात उत्पन्न बुडाले असताना आर्थिक स्थिती कशी भरून काढणार? असा प्रश्न एसटी समोर आहे. असे असताना आपण एसटी सेवा बंद केली आहे आणि कर्नाटक मात्र, आपल्या प्रवाशांचा वापर करून पैसा मिळवत आहे. त्यामुळे एकतर कर्नाटकची बससेवा बंद करावी किंवा महाराष्ट्र सरकारने एसटी महामंडळाला कर्नाटकात बससेवा सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.