कोल्हापूर - कारखानदार काटामारी करून शेतकऱ्यांची लूट करतात, अशा नेहमीच तक्रारी येत असतात. येथील अथणी शुगर्सबाबतसुद्धा अशीच एक तक्रार जय शिवराय संघटनेकडे एका शेतकऱ्याने केली. याबाबत संघटनेने वजन मापक विभागाकडे लेखी तक्रार दिली. संबंधित विभागानेसुद्धा तात्काळ दखल घेत अथणी शुगर्सची तपासणी केली असता तब्बल 1 टनाचा फरक आढळत असल्याचे निदर्शनास आले. जय शिवराज संघटनेने याबाबत माहिती देऊन याचे चित्रीकरण सुद्धा केले.
हेही वाचा - Chandrakant Patil On Shivsena : राष्ट्रवादीच्या मागे लागून शिवसेना वारंवार तोंड फोडून घेते - चंद्रकांत पाटील
काय आहे प्रकरण? यावर एक नजर
शाहूवाडी तालुक्यातील बांबवडेमध्ये अथणी शुगर्स कारखाना आहे. या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून काटामारी सुरू आहे, अशी तक्रार येत होती. वसंत कांदेकर या शेतकऱ्याला सुद्धा असाच अनुभव आल्यानंतर त्यांनी याबाबत जय शिवराय संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव माने यांच्याकडे तक्रार दिली. संघटनेने याबाबत वजन मापक विभागाकडे लेखी तक्रार देत संबंधित कारखान्याची तपासणी करण्याबाबत विनंती केली होती. संबंधित अधिकाऱ्यांनी सुद्धा घटनेची गंभीर्यता लक्षात घेऊन अथणी शुगर्स कारखान्याच्या वजन काट्याची तपासणी केली.
तपासणी दरम्यान, अधिकाऱ्यांना एका ट्रकच्या खेपेमागे तब्बल 1 टनाचा फरक आढळून आला. ट्रॅक्टरमागे सुद्धा सव्वा टन आणि बैलगाडीमागे 800 किलोचा फरक आढळून आला असल्याचे दिसून आले. हे सर्व संघटनेने आपल्या कॅमेरात कैद केले. यावेळी सांगलीचे वजन मापक उपनियंत्रक डी.पी. पवार, कोल्हापूर विभागाचे सहाय्यक नियंत्रक ए.टी. पाटील यांच्यासह शाहूवाडी विभागाचे उपनियंत्रक एस.बी. सावंत आदींनी या संपूर्ण घटनेचा पंचनामा केला. त्यामुळे, आता नेमकी काय कारवाई होते? हे पाहावे लागणार आहे.
शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अन्यथा...
दरम्यान, आज ट्रॅक्टर, ट्रक मागे एवढ्या मोठ्या प्रमाणात वजनात फरक आढळला आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू असल्याचे दिसून आले असून, संबंधित विभागाने त्यांच्यावर कडक कारवाई करून शेतकऱ्यांना त्यांची भरपाई द्यावी. अन्यथा साखर आयुक्तांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारासुद्धा संघटनेचे शिवाजीराव माने यांनी दिला.
हेही वाचा - पतंग उडवा पण आपल्यामुळे कोणाला इजा पोहोचणार नाही याचीही घ्या काळजी; ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट