नवी दिल्ली- भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) एकाच दिवसात विक्रमी टोल संकलन केले आहे. फास्टॅगमधून प्राधिकरणाला शुक्रवारी ८० कोटी रुपये मिळाले आहेत. नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी १ जानेवारीपासून फास्टॅग बंधनकारक करणार असल्याचे जाहीर केले आहे.
पहिल्यांदाच फास्टॅगमधून टोल संकलनाने २४ डिसेंबर २०२० ला ८० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्यादिवशी ५० लाख फास्टॅगचे व्यवहार झाले. हा ऐतिहासिक टप्पा असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने म्हटले आहे.
हेही वाचा-#निरोप2020 : जागतिक स्तरावरील विविध निर्देशांकातील भारताची कामगिरी
केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने १ जानेवारी २०२१ पासून सर्व प्रकारच्या चारचाकी वाहनांसाठी फास्टॅगचा वापर बंधनकारक केला आहे. फास्टॅगमुळे इंधनासह वेळेची बचत होत असल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे. केंद्रीय मोटर वाहन कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर टोल संकलनातून डिजीटल व्यवहार वाढले आहेत. फास्टॅग हे अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलवरही उपलब्ध आहेत. फास्टॅगची २७ बँकांबरोबर भागीदारी आहे. कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे प्रवाशांकडून फास्टॅगचा वापर वाढत असल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे.
हेही वाचा-नवीन वर्षात फोक्सवॅगन इंडियाच्या वाढणार किमती
काय आहे फास्टॅग?
फास्टॅग ही टोलचे पैसे प्रीपेड भरण्याची सुविधा आहे. यामुळे वाहनचालकाला टोलनाक्यावर वाहन न थांबविता पुढे जाणे शक्य होते. यामध्ये रेडिओ फिक्वेन्सीची ओळख असलेली चीप वाहनाला बसविण्यात येते.