हैदराबाद- कोरोना महामारी आणि टाळेबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कर्जदारांना केंद्र सरकारने दिलासा देणारा घेतला आहे. या निर्णयानुसार कर्जफेडीच्या सहा महिन्यांच्या मुदतवाढीत लागू होणारे चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावरील व्याज माफ होणार आहे.
कर्जफेडीसाठी मुदतवाढ घेतलेले अथवा न घेतलेले सर्व कर्जदार हे चक्रवाढ व्याज माफीसाठी आपोआप पात्र ठरणार आहेत.
- काय आहे ही योजना?
१ मार्च २०२० ते ३१ ऑगस्ट २०२० कालावधीतील कर्जावरील चक्रवाढ माफ होणार आहे.
- या योजनेचा काय फायदा आहे?
जर तुम्ही थकित कर्जाच्या व्याजावरील व्याज भरले असेल तर तुम्हाला ती रक्कम परत मिळणार आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार हे व्याजावरील व्याजाची घेतलेली रक्कम कर्जदारांच्या खात्यावर ५ नोव्हेंबर २०२० पर्यंत मिळणार आहे. असे असले तरी कर्जदारांना नियमाप्रमाणे लागू होणारे व्याज द्यावे लागणार आहे. हे व्याज माफ होणार नाही.
- योजनेसाठी कोण पात्र आहे?
ज्यांनी २ कोटीपर्यंत कर्ज घेतले आहेत, असे सर्व कर्जदार चक्रवाढ व्याज माफीसाठी पात्र आहेत. यामध्ये सूक्ष्म, लहान आणि मध्यम (एमएसएमई) कर्ज, शैक्षणिक कर्ज, गृहकर्ज, क्रेडिट कार्डवरील कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि व्यावसायिक कर्ज अशा कर्जांचा समावेश आहे. मात्र, २९ फेब्रुवारीपर्यंत बुडित कर्ज खाती (एनपीए) असलेल्या कर्जदारांचे चक्रवाढ व्याज माफ होणार नाही. ज्यांनी अंशत: अथवा कर्जफेडीच्या मुदतवाढीचा फायदा घेतला नाही, त्यांनाही या योजनेचा फायदा होणार आहे. जरी तुम्ही मार्च ते ऑगस्ट २०२० दरम्यान चक्रवाढ व्याज भरले तर हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. ही चक्रवाढ माफीची योजना सर्व वित्तीय संस्था, बँका, सार्वजनिक बँका, सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका, बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या आणि गृहकर्ज कंपन्यांना देणे बंधनकारक आहे.
क्रेडिट कार्डवरील कर्जासाठी काय नियम आहेत?
क्रेडिट कार्डच्या वापरकर्त्यांसाठी व्याज हे डब्ल्यूएएलआरप्रमाणे लागू होणार आहे.
५ नोव्हेंबरपूर्वी योजनेचा लाभ देण्याचे आरबीआयचे बँकांना निर्देश
बँकांनी कर्जदारांना चक्रवाढ व्याजमाफी देण्याचे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दिले आहेत. कर्जदारांकडून चक्रवाढ व्याजाचे घेतलेले पैसे ५ नोव्हेंबरपूर्वी परत देण्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाने निर्देश दिले आहेत. या वेळेचे पालन करावे, असे आरबीआयने बँकांना पाठविलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.