नवी दिल्ली- संपूर्ण देशात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. याचा मोठा फटका देशातील व्यवसायांना बसला असून दिल्ली मेट्रोचादेखील यात समावेश आहे. कोरोनामुळे दिल्ली मेट्रोला 1 हजार 200 कोटींचे नुकसान झाले आहे.
कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांपासून मेट्रो बंद आहे. त्यामुळे दिल्ली मेट्रो महामंडळाला मोठे नुकसान सोसावे लागत आहे. नुकसानीमुळे मेट्रो महामंडळाला कर्जाची परतफेड करण्यास अडचण निर्माण झाली आहे. याचा परिणाम व्यवस्थापनाकडून कर्जाची परतफेड होण्यासंदर्भी जी विश्वसनियता आहे, त्याच्यावर होत आहे.
दिल्लीत मेट्रोचे जाळे पसरविण्यासाठी भारत आणि जपान यांच्यात जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशनकडून 35 हजार कोटी रुपये घेण्याचा करार झाला आहे. रकमेतील काही भाग दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाला पुढल्या 30 वर्षात द्यायचा आहे. दरम्यान, परिस्थिती सामान्य असताना दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाला दररोज 10 कोटी रुपयांची कमाई व्हायची. त्यामुळे सगळे सुरळीत होते. मात्र, आता मेट्रो ठप्प असल्याने मंडळाला नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे साहजिकच याचा परिणाम कर्ज परतफेडीवरदेखील होत आहे. यामुळे परिस्थिती बघता मेट्रो महामंडळाने केंद्र सरकारकडे कर्जपरताव्याचा अवधी वाढवण्याची विनंती केली आहे.
दरम्यान, अत्त्यावशक अंतर्गत देखभाल कामकाजासाठी दिल्ली मेट्रो प्रणाली सुरू राहणार आहे. तसेच, दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाकडून 1000 कर्मचाऱ्यांना पगार देखील दिले जात आहे.