पुरी - लॉकडाऊनचा परिणाम धार्मिक स्थळांवरही मोठ्या प्रमाणात झाला आहे. शुक्रवारी पहिल्यांदाच भगवान जगन्नाथ यांची वार्षिक स्नान पौर्णिमा भाविकांच्या अनुपस्थितीत करण्यात आली. फक्त पुजाऱ्यांच्या उपस्थितीत हा विधी पार पडला असल्याचे सांगितले. मात्र, यावेळी मास्कचा वापर न करता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांकडेही दुर्लक्ष केले गेले.
या कार्यक्रमासाठी मर्यादित लोकांचीच आवश्यकता होती. मात्र, समोर आलेल्या व्हिडिओमध्ये यात अनेक लोक हजर दिसले. यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे उल्लंघन झाले असून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. यावेळी अनेक सेवक देवाच्या मूर्तीच्या आजूबाजूला फिरताना दिसले.
पहाटे दीड वाजताच्या सुमारास मूर्ती मंदिराच्या बाहेर आणल्या गेल्या. यात सहभागी सेविकांची कोरोना चाचणी केली गेली होती. या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी रथयात्रा पर्वाच्या आधी केले जाते. ही रथरात्रा इतर वर्षी लाखो भाविकांचे आकर्षण ठरते.
भगवान बलभद्र, देवी सुभद्रा, भगवान जगन्नाथ आणि भगवान सुदर्शन यांना मंदिर परिसरात बसवले गेले. यानंतर मंत्रोच्चारासह 108 सुगंधी पाण्याच्या घड्यांनी त्यांना स्नान घालण्यात आले. याच विधीला स्नान बेदी, असे नाव आहे. या स्नानासाठी सोना कुआं ( सोन्याची विहिर) येथून पाणी घेतले जाते. यावर्षी या स्नानावेळी हरी बोलचा जप करणारे भाविक अनुपस्थित होते.
याबद्दल बोलताना पुरीचे जिल्हाधिकारी बलवंत सिंग म्हणाले, यंदा जिल्ह्यात कलम 144 लागू असल्याने जास्त लोकांना जमू द्यायचे नव्हते. याच अनुषंगाने कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोरोनामुळे यंदा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत स्नान पोर्णिमा साजरी केली गेल्याचे त्यांनी सांगितले.