पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना आपत्ती व्यवस्थापनाचा मोठा अनुभव आहे. त्यांना सध्याच्या स्थितीत सहभागी करून घेतले पाहिजे. त्यांचा एक फोन चित्र बदलवतो, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. सध्या राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. आता मुख्यमंत्र्यांनी हा स्वतः पुरता विषय न ठेवता सर्वांना सोबत घेण्याची आवश्यकता आहे, असेही मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केले आहे. पुण्यात एका कोरोना विलगीकरण केंद्राचे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते. केंद्राकडून राज्याला सर्वाधिक रेमडीसीवर इंजेक्शन मिळले आहेत. चार्ट पाहिला तर हे लक्षात येईल. मात्र अपयश लपवण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवल जात असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्षांनी केला. नाशिक आणि विरारच्या हॉस्पिटल दुर्घटनेबाबत बोलताना पाटील म्हणाले, की अशा प्रकरणामध्ये कुठल्याही चौकशीशिवाय निष्कर्षावर जायला नको. डॉक्टर मेडिकल स्टाफ कोरोना काळात अहोरात्र काम करत आहे. काही चूक होऊ शकते. मात्र, अन्य ठिकाणी अशा घटना होणार नाही, याची काळजी घ्यावी.