अमरावती: जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळत असताना चांदूर बाजार तालुक्यात अनेक ठिकाणी पुराने थैमान घातले आहे. अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली आहे. माधान या गावत बारा एकर शेतात पाणी शिरल्याने कापसाला मोठा फटका बसला आहे. चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथे पुराच्या पाण्यातून दुचाकी वाहून जात होती. गाडीला वाचविण्याचा प्रयत्न करणे एका व्यक्तीच्या जीवावर बेतणार होते. मात्र सुदैवाने दुचाकीस्वार एका झाडाला अडकल्यावर गावातील युवकांनी धाव घेऊन त्याला पुरातून कसेबसे बाहेर काढले. तर पाणी वाहत असणाऱ्या मार्गावरून कोणी जाण्याचे धाडस करू नये असा इशारा, प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच वरुड तालुक्यातील चूडामडी नदीला पूर आल्याने, शेंदुरजना घाट ते तिवसा घाट या दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. तर आणखी चार दिवस असाच पाऊस बरसणार आल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.