नागपूर: नागपूर शहराला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या ओसीडब्ल्यू या खासगी कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची मागणी करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज नागपूरात अनोखा 'वरात' मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नवरदेव, बँड-बाजा, वऱ्हाडीही देखील होते. नागपूरात पाणीपुरवठ्याची जबाबदारी असलेली ओसीडब्ल्यू या कंपनीचे कंत्राट रद्द करावे या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. गेल्या 12 वर्षांपासून नागपूर शहराला पाणी पुरवठ्याची जबादारी ओसीडब्ल्यू कंपनीकडे आहे. सुरवातीला 24 तास पाणी पुरवठा करणार असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र शहराला 24 तास तर सोडाच धड एक तास देखील पाणी पुरवठा होत नाही. कामात अपयशी ठरूनही मनपा कंपनीला वारंवार काम देत आहे. त्यामुळे ही खासगी कंपनी काही नागपूर मनपाचा जावई आहे का? असा प्रश्न उपस्थित करीत मनसेने मनपावर हा मोर्चा काढला.