मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मानहानीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते, राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर अशाच पद्धतीने आमदार बच्चू कडू यांनासुद्धा शिक्षा झाल्याचे समोर आले आहे व त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बॅनरबाजी केली आहे. बच्चू कडू यांची आमदारकीसुद्धा रद्द केली जायला हवी, अशी त्यांनी मागणी केली आहे. परंतु एकंदरीत या प्रकरणावर बोलताना भाजप नेते, आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले आहे की, राहुल गांधी व बच्चू कडू ही दोन्ही भिन्न प्रकरण आहेत. बच्चू कडू यांना एक एक वर्षाच्या दोन शिक्षा झाल्या आहेत. त्यांना सलग दोन वर्षाची शिक्षा झाली नाही आहे. कायद्याप्रमाणे ज्या व्यक्तीस दोन किंवा त्यापेक्षा अधिक वर्षाची शिक्षा होते त्याचे सदस्यत्व रद्द केले जाते. परंतु, हे प्रकरण वेगळे आहे. राहुल गांधींचे सद्यसत्व रद्द करण्यामागे भारतीय जनता पार्टी आहे, हे सांगितले जाते. पण, काँग्रेसचे हे सांगणे हास्यास्पद असल्याचही अतुल भातखळकर यांनी सांगितले आहे.