ठाणे - आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी दादर येथील चैत्यभूमी बाहेर एक वेगळे चित्र पहायला मिळाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू सुजात आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एकमेकांची गळा भेट घेत तब्बल सात ते आठ मिनिटे चर्चा केली. या दोघांमध्ये नक्की काय चर्चा झाली हे स्पष्ट नसले तरीही राज्यातील एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता या भेटीला महत्वपूर्ण मानले जात आहे. या दोघांमधील ही भेट राज्यातील राजकीय पार्श्वभूमीवर भविष्यातील युती अथवा राजकीय वाटचालीवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधी देखील फर्ग्युसन कॉलेज येथे सुजात आंबेडकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनीच त्यांना पहिली मदत केली होती. सध्या उद्धव ठाकरे आणि वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये संभाव्य युतीवरून चर्चा सुरू असतानाच आव्हाड आणि सुजाता आंबेडकर यांच्यात झालेल्या भेटीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST