महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 6, 2021, 9:45 AM IST

ETV Bharat / state

साठ टक्के पीक कर्जवाटप मे अखेरपर्यंत करा; जिल्हाधिकारी येडगे

जिल्ह्यात सद्यस्थितीत 15 टक्के पीक कर्जवाटप झाले आहे. जून अखेरपर्यंत संपूर्ण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मे अखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत 60 टक्के कर्जवाटप झालेच पाहिजे. त्यासाठी बँकांनी रोजचे उद्दिष्ट ठरवून शेतकऱ्यांना वाटप करावे

साठ टक्के पीक कर्जवाटप मे अखेरपर्यंत करा
साठ टक्के पीक कर्जवाटप मे अखेरपर्यंत करा

यवतमाळ - खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप हा महत्वाचा विषय आहे. कोरोनाची परिस्थिती असली तरी सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच शासनाच्या नियमांचे पालन करून शेतकऱ्यांना कर्जवाटपासाठी बँकांनी काम करावे. सध्या कर्जवाटपाची गती जेमतेम आहे. ही गती वाढवून मे महिन्याच्या अखेपर्यंत सर्व बँकांनी 60 टक्के पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट साध्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.

सद्यस्थितीत 15 टक्के पीक कर्जवाटप

गत आर्थिक वर्षाची बँकांची सर्व प्रलंबित कामे संपत आली आहे. त्यामुळे आता पीक कर्जवाटपाची गती वाढविणे आवश्यक आहे, जिल्ह्यात सद्यस्थितीत 15 टक्के पीक कर्जवाटप झाले आहे. जून अखेरपर्यंत संपूर्ण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मे अखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत 60 टक्के कर्जवाटप झालेच पाहिजे. त्यासाठी बँकांनी रोजचे उद्दिष्ट ठरवून शेतकऱ्यांना वाटप करावे. पीक कर्जासाठी शेतकरी बँकाकडे येणार आहे. बँकासुध्दा शेतकऱ्यांना सहकार्य करीत आहे, असा संदेश शेतकऱ्यांमध्ये पोहोचला पाहिजे.

बँकांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक

किचकट प्रक्रिया किंवा कागदपत्रांअभावी शेतकऱ्यांची अडवणूक होऊ देऊ नका. कोणत्या बँकेने रोज किती शेतकऱ्यांना, किती कर्जवाटप केले आहे, याची तपासणी जिल्हा अग्रणी बँकेकडून केली जाईल. त्यामुळे कसे नियोजन करायचे हे आधीच बँकांनी ठरवून घ्यावे. बँकांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. एखाद्या प्रतिष्ठित शेतकऱ्यांमार्फत गावातील इतर शेतकऱ्यांपर्यंत कर्जवाटप सुरू झाल्याचा संदेश पोहचविण्याचे निर्देश दिले.

आठवड्याला पीक कर्जवाटपाचा आढावा

प्रत्येक आठवड्याला पीक कर्जवाटपाचा आढावा घेण्यात येणार आहे. यात कोणत्याही बँकांची कामगिरी निराशाजनक दिसता कामा नये, अशाही सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या. यावेळी त्यांनी बँकनिहाय पीक कर्जवाटपाचा आढावा घेतला.

खरीप हंगाम 2020-21 मध्ये जिल्ह्याला 2210 कोटी रुपयांचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. 4 मे 2021 पर्यंत 40564 शेतक-यांना 321 कोटी 19 लक्ष रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. यात सर्वाधिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 33952 शेतक-यांना 248 कोटी 37 लाख रुपये, स्टेट बँक ऑफ इंडियाने 2331 शेतक-यांना 26 कोटी 27 लाख, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 1248 शेतक-यांना 13 कोटी 12 लाख रुपये पीक कर्जवाटप केले केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details