महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 19, 2020, 10:12 AM IST

ETV Bharat / state

'गाव करी ते राव काय करी'; कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी 'हे' गाव करतेय अनोख्या उपाययोजना

यवतमाळच्या दारव्हा तालुक्यात वाकद राजीवनगर हे अकराशे लोकवस्तीचे गाव आहे. 'आमचं गाव, आमचं सरकार' असे ठरवून कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी संपूर्ण गावाने नियोजन केले आहे. या अनुषंगाने गावकऱ्यांनी काही नियम बनवले असून त्याचे पालन गावकरी करत आहेत. जो या नियमांचे पालन करत नाही त्याला दंडसुध्दा गावकरी करत आहेत.

Villagers
गावकरी

यवतमाळ - दारव्हा तालुक्यातील वाकद राजीवनगर गाव हे इतर गावांसाठी आदर्श ठरत आहे. 'आमचं गाव, आमचं सरकार' असे ठरवून कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी संपूर्ण गावाने नियोजन केले आहे. या अनुषंगाने गावकऱ्यांनी काही नियम बनवले असून त्याचे पालन गावकरी करत आहेत. जो या नियमांचे पालन करत नाही त्याला दंडसुध्दा गावकरी करत आहेत.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी 'हे' गाव करतेय अनोख्या उपाययोजना

यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील वाकद राजीवनगर हे अकराशे लोकवस्तीचे गाव आहे. महसूल, पोलीस कर्मचारी किंवा अन्य कोणीही आल्यास त्याला गावात थेट प्रवेश दिला जात नाही. गावच्या वेशीवर गावकऱ्यांनी कुंपण तयार केले असून त्याच्या पलिकडे हात-पाय धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हात-पाय स्वच्छ धुतल्याशिवाय गावात कुणालाच प्रवेश मिळत नाही. बाहेर गावावरून आलेल्या प्रत्येकाची गावात नोंद होते. जर शेजारच्या गावातील नातलगांना भेटायचे असेल किंवा जो काही संवाद साधायचा तो गावाच्या प्रवेशद्वारजवळच करण्याची परवानगी आहे. दुरूनच माहिती घेऊन त्या पाहुण्याला तेथूनच परत पाठवले जाते.

गावात कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीच्यावतीने सर्व नाल्या, रस्ते स्वच्छ करण्यात आले आहेत. गावातील व्यक्ती जर बाहेर गेला तर त्याला दुपारी बारावाजण्या अगोदर परत यावे लागते. गावच्या ग्रामपंचायत सदस्यांची गावच्या वेशीवर दर एकदिवसाआड नियुक्ती केली जाते. गावातील नाईक, कारभारी आणि गावातील प्रमुख व्यक्ती हे सगळ्याबाबींवर लक्ष ठेवून आपली जबाबदारी पार पाडतात.

गावात वेगवेगळ्या प्रांतातून कामानिमित्त बाहेर गेलेले लोक परत आले. त्यांना थेट गावात प्रवेश मिळाला नाही. सर्वांना प्रथम दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यास सांगितली. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गावामध्ये त्या व्यक्तींना प्रवेश दिला आहे. विशेष म्हणजे गावामध्ये प्रत्येक व्यक्ती हा कापडी मास्क लावूनच फिरतो. गावकऱ्यांनी संपूर्ण गावकाऱ्यांसाठी हे मास्क शिवून मोफत वाटले आहेत.

आठवड्यातून एक दिवस 4 किराणा दुकानदार अत्यावश्यक साहित्याची नोंद करून ते घेऊन येतात. किराणा दुकानही सकाळी 7 ते 12 याच वेळेत सुरू राहते. गावामधील प्रार्थना मंदिरामधून गावकऱ्यांना कोरोनापासून बचावाचा सूचना त्यांच्या बोलीभाषेत सांगितल्या जातात. कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये सर्व गावकऱ्यांचे सहकार्य मिळत आहे. त्यामुळे या गावची सर्वत्र चर्चा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details