यवतमाळ - वादळी वाऱ्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुरुवारी कहर केला. यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहाणी झाली. यावेळी करंजखेड येथील आत्माराम मरेजी ठाकरे (६९) यांच्या घरावर वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. गुरूवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घडली.
वादळ आणि ढगांच्या गडगडाटासह आलेल्या पावसाने करंजखेड गावात हैदोस घातला. या नैसर्गिक आपत्तीत ठाकरे यांच्या घरावर वीज कोसळली. यामुळे त्यांचे संपूर्ण घर कोसळले. या दुर्घटनेत ठाकरे गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला.
करंजखेड गावात दुसऱ्या एका घटनेत घराच्या पत्र्यावर ठेवलेला दगड डोक्यात पडल्याने गजानन किसन राठोड (३५) गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोन्ही घटनास्थळी तहसीलदार निलेश मडके यांनी भेट दिली असून गावातील नुकसानीचा पंचनामा महसूल प्रशासनाकडून सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
दारव्हा तालुक्यातील लाखखिंडलाही या वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. यामुळे गावातील अनेक घरांची पडझड झाली आहे. तसेच काही व्यक्ती किरकोळ जखमी झाल्याचे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दुसरीकडे दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात आग लागल्याची घटनाही गुरुवारी घडली. मात्र, आगीची माहिती मिळताच नागरिकांनी तात्काळ उमरखेड नगरपालिकेला याबाबत माहिती कळवली. त्यानंतर पालिकेच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणली.