यवतमाळ - दोन महिन्यांपूर्वी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यातून शेतकरी सावरण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी गारपीटही झाली. त्यामुळे शेतातील वेचणीला आलेला कापूस ओला झाला आहे. तुरीला आलेला बहर गळून जात आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे.
अवकाळी पावसाने शेतकरी अडचणीत
हेही वाचा - शेतात येऊन पाहिलं; दुसऱ्या दिवशी कापूस, संत्रा काढायचं ठरवलं, पण गारपीट आली अन्...
जिल्ह्यात मागील आठवड्यापासून ढगाळ वातावरण असून ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे वेचणीवर आलेला कापूस शेतातच गळून पडला आहे. जो कापूस शेतकऱ्यांच्या हाती लागेल त्याची प्रत चांगली नसल्याने या कापसाला योग्य भावही मिळणार नाही. तुरीची फुले गळून पडल्याने उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे.